वसतिगृहाच्या अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी धरले धारेवर, जेवणाचा आखो देखा हाल पाहिल्यानंतर पारा चढला
रत्नागिरी : राज्याचे उद्योग मंत्री रत्नागिरी - रायगडचे पालकमंत्री उदय सामंत हे रत्नागिरी दौरावर असताना अचानक रत्नागिरी येथील समाज कल्याणच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन वसतिगृहाला भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांच्या असणाऱ्या अडीअडचणींबाबत माहिती घेतली. विद्यार्थ्यांच्या जेवणाचा आखों देखा हाल पाहिल्यानंतर पालकमंत्र्यांचा पारा चढला आणि त्यांनी समाज कल्याणच्या वसतिगृहाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
रत्नागिरी समाज कल्याण वसतिगृहामध्ये एकूण ८५ विद्यार्थी राहत असून त्यांच्या जेवण, नाश्ता याचे टेंडर एका कंपनीला देण्यात आले असून या कंपनीकडून निकृष्ट दर्जाचे जेवण या विद्यार्थ्यांना दिले जात आहे. शासनाच्या जीआर अनुसार ज्या पद्धतीने मेनू ठेवून दिला आहे त्या मेनूप्रमाणे कोणतेही जेवण विद्यार्थ्यांना दिले जात नसल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या लक्षात आले. त्यांनी जेवणा संदर्भात आणि इतर समस्यां संदर्भात वसतिगृहातील विद्यार्थ्यांशी चर्चा केली. यावेळेस विद्यार्थ्यांना शासनाकडून दिले जाणारे भत्ते, युनिफॉर्म आणि इतर सोयी सुविधांचा अभाव असल्याचेही त्यांच्या लक्षात आले. संबंधित अधिकारी विद्यार्थ्यांना आवश्यक बाबी पुरवत नसल्याने सामंत यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली.