नाशिकमध्ये पतंग जीवावर बेतला; १५ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

तुटलेला मांजा विजेच्या तांरामध्ये अडकून काही ठिकाणी आगी देखील लागण्याच्या घटना घडलेल्या आहेत.
नाशिकमध्ये पतंग जीवावर बेतला; १५ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

नाशिक : मकर संक्रातीच्या पूर्वसंध्येलाच नाशिकमध्ये विजेच्या तारांवरील अडकलेली पतंग काढायला गेलेल्या भाग्येश विजय वाघ (१५) या मुलाचा विजेच्या जोरदार झटक्याने मृत्यू झाला आहे. तो दहावी इयत्तेत शिक्षण घेत होता.

रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील साई राम रो हाऊस जवळ काही मुले खेळत होती. याचवेळी विजेच्या तारांवर अडकलेली पतंग काढण्यासाठी भाग्येशने एका स्टीलच्या रॉडचा आधार घेताच त्याला विजेचा जोरदार झटका बसला.

त्याला परिसरातील नागरिकांनी तात्काळ उपचारासाठी त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केले.त्यानंतर वडिलांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. भाग्येश हा इयत्ता दहावीत शिकत होता, त्याच्या पश्चात आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पतंगाच्या मांजामुळे पक्षी, प्राणी व मानवी जिवीतास धोका निर्माण होतो. पक्षी, प्राणी, नागरिक, बालके, वयोवृद्ध, वाहनस्वार जखमी होण्याचे अथवा प्राण गमाविण्याच्या घटना याआधी घडल्या आहेत. तुटलेला मांजा विजेच्या तांरामध्ये अडकून काही ठिकाणी आगी देखील लागण्याच्या घटना घडलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांकडून दि. २३ जानेवारीपर्यंत नायलॉन मांज्याची विक्री व वापरावर मनाई आदेश जारी करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in