पंढरपूर-आळंदी पालखी मार्ग खचला; वारकऱ्यांना चिंता

पंढरपूर-आळंदी पालखी मार्ग खचला; वारकऱ्यांना चिंता

पंढरपूर वारीला जाण्यासाठी नव्याने तयार करण्यात आलेला पंढरपूर ते आळंदी मार्ग अवघ्या दीड वर्षात खचल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे.
Published on

नवनाथ खिलारे/पंढरपूर

साऱ्या वारकऱ्यांना पंढरपूरच्या विठ्ठल भेटीचे वेध लागले असतानाच, त्यांच्या चिंतेत भर पडणारी एक बातमी उजेडात आली आहे. पंढरपूर वारीला जाण्यासाठी नव्याने तयार करण्यात आलेला पंढरपूर ते आळंदी मार्ग अवघ्या दीड वर्षात खचल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. त्यामुळे या पालखी मार्गाच्या गुणवत्तेबाबत भलेमोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

येत्या २८ जून रोजी देहूहून तुकारामाची तर २९ जून रोजी आळंदीहून संत ज्ञानेश्वरांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. १७ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. या पंढरपूरच्या वारीचे राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या वारकऱ्यांना वेध लागले आहेत. आषाढी वारीनिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात. पंढरपूर दर्शनाची वाट सुकर होण्याच्यादृष्टीने केंद्र व राज्य सरकारने पालखी मार्ग उभारण्याचे निश्चित केले होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वारकऱ्यांसाठी सुमारे १० हजार कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या पालखी मार्गापैकी माळशिरस तालुक्यातील तोंडले बोंडले ते वेळापूर दरम्यानचा २०० मीटर रस्ता काल ६० फूट खोल खचला आहे. हा खचलेला पालखी मार्ग त्वरित दुरूस्त करावा अशी मागणी संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम वारकऱ्यांमधून होत आहे.

logo
marathi.freepressjournal.in