
दसऱ्याच्या दिवशी अनेक मदिरांमध्ये बकऱ्याचा अथवा कोंबड्याचा बळी देण्याची प्रथा आहे. नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी गडावरील बोकडबळीची प्रथा गेल्या पाच वर्षांपासून बंद करण्यात आली होती. आता बोकड बळीची प्रथा पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी हायकोर्टानेच परवानगी दिली आहे. त्यामुळे येत्या दसऱ्याच्या मुहूर्तापासून सप्तश्रुंगी गडावरील ही प्रथा पुन्हा सुरू होणार आहे.
आदिवासी विकास सोसायटीच्या वतीने ही प्रथा पुन्हा सुरु व्हावी यासाठी हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करत कोर्टाने आता या प्रथेला पुन्हा परवानगी दिली आहे. दसऱ्याच्या दिवशी सप्तशृंगी गडावर महिषासुराच्या रुपात बोकडाचा बळी दिला जातो, अशी परंपरा आहे. मात्र २०१६ ला मंदिर आवारात बोकडबळी देताना काही कारणास्तव १२ जण जखमी झाले होते. तेव्हापासून सुरक्षेच्या कारणास्तव ही बोकड बळीची प्रथा बंद करण्यात आली होती. सुरुवातीला भाविकांनी या निर्णयावर मोठा विरोध दर्शवला होता, मात्र नंतर भाविकांनीही प्रशासनाला सहकार्य करत ही प्रथा पूर्णपणे बंद केली होती.
गेल्या ५ वर्षापासून बोकड बळीची प्रथा बंद होती, मात्र धोडांबे येथील आदिवासी विकास सोसायटीच्या वतीने बोकडबळीची प्रथा पुन्हा सुरू व्हावी, यासाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर सुनावणी होत, कोर्टाने अटी-शर्थीसह ही प्रथा पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे यंदा दसऱ्याच्या मुहूर्तावर ही प्रथा पूर्ण जल्लोषात पार पडली जाणार आहे. या निर्णयामुळे दसऱ्याच्या मुहूर्तावर नवस आणि विविध कारणातून बोकडबळी देणाऱ्या भाविकांना आता आपले नवस फेडता येणार आहेत.