उल्हास नदीच्या पुरात वाहून गेला तरूण, रेस्क्यू टीमने महापुरात उतरून वाचवला जीव

कर्जत तालुक्यातील टाकवे येथील आदिवासी तरुण गणेश पवार हा कामासाठी घराबाहेर निघाला आणि महापुराच्या पाण्यात वाहून गेला.
उल्हास नदीच्या पुरात वाहून गेला तरूण, रेस्क्यू टीमने महापुरात उतरून वाचवला जीव
Published on

विजय मांडे/ कर्जत:

कर्जत तालुक्यातील टाकवे येथील आदिवासी तरुण गणेश पवार हा कामासाठी घराबाहेर निघाला आणि महापुराच्या पाण्यात वाहून गेला. पोहता येत असल्याने उल्हास नदीला पूर आलेला असताना देखील जिद्दीने नदीतून वाट काढत झाडाची मदत घेतली आणि तेथे तग धरून थांबून राहिला. त्यानंतर अपघातग्रस्त मदतीसाठी या रेस्क्यू टीमने महापुरात वाहत्या पाण्यात उतरून त्या तरुणाला सुखरूप बाहेर काढले.

कामानिमित्त घराबाहेर पडलेला तालुका कडाव जवळील टाकवे गावातील आदिवासी तरुण गणेश पवार हा पाण्यात कोसळला. पोहता येत असल्याने हा तरुण चोहोबाजूंनी पाण्याने वेढलेल्या नदीमधून वाट काढत बेंडसे गावाजवळ नदीमधून एका बाजूला पोहचला. गुरुनाथ साठलेकर यांच्या नेतृत्वाखाली किमान तीनशे मीटर आत जावून झाडाच्या सहाय्याने पुरातून त्या तरुणाला सुखरूप बाहेर काढले. कर्जतमधील नेरळ, शेलू, कर्जत अशा उल्हास नदीच्या पुराने प्रभावित भागात उपविभागीय अधिकारी अजित नैराळे, तहसीलदार डॉ. शीतल रसाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी डी. डी. टेळे, नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे, कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजीव वानखेडे आदींनी भेट देत तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.

तसेच आपल्या विभागाच्या कर्मचाऱ्यांना नागरिकांना मदत करण्याच्या दृष्टीने सूचना दिल्या. 'हवामान विभागाकडून पुढील २४ तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तेव्हा नागरिकांनी घरात सुरक्षित राहावे. महत्त्वाचे काम नसल्यास बाहेर पडू नये. व प्रशासनाच्या सूचनेचे पालन करावे असे आवाहन डॉ. शीतल रसाळ, तहसीलदार कर्जत यांनी केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in