राज्यात शेकडो वर्षापासून वारीची परंपरा आहे. हजारोच्या संख्येने वारकरी भागवत धर्माची पताका घेऊन आपल्या पांडूरंगाच्या दर्शनाला मार्गक्रमण करतात. मात्र, यावेळी माहाराष्ट्राच्या इतिहासात आजवर कधीही न घडलेली घटना घडली आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच वारकऱ्यांवर लाठीमार करण्यात आला. आळंदीत माऊलींच्या पालखी प्रस्तानाच्या कार्यक्रमाच्या दिवशी मंदिरात प्रवेश करण्यावरुन पोलीस आणि वारकरी यांच्या मोठा वाद झाला. यावेळी पोलिसांनी वारकऱ्यांना मंदिरात जाण्यापासून रोखून धरलं. यावेळी वारकऱ्यांनी मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीचार्ज केला.
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने सर्वत्र संतापाची लाट पसरली. राज्यातील विरोधी पक्षांनी यावरुन सरकारवर हल्लाबोल केला. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र लाठीचार्ज केल्याचे सर्व आरोप फेटाळले आहेत. दुसरीकडे या घटनेचा दुसरा व्हिडिओ जारी करत वारकऱ्यांनी पोलिसांना धक्का देत तुडवल्याच सांगितलं जात आहे. तसंच काही वारकऱ्यांनी तर आपल्याला खोलीत डांबून पोलिसांकडून मारहाण झाल्याचा आरोप देखील केला आहे. या घटनेचे पडसाद थेट महाराष्ट्राच्या राजकारणावर पडले आहेत. या घटनेप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी माफी मागतली नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पंढरपुरात पाय ठेवू येणार नाही. असा इशाऱा देखील संभाजी ब्रिगेडकडून देण्यात आला आहे. संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी संतोष शिंदे यांनी हा इशारा दिला आहे. आळंदी येथील घटनेची नैतीक जबाबदारी स्वीकारुन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांची माफी मागावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.