उजनी धरणाचे पाणी ओसरले; पळसनाथ मंदिरासह इनामदार वाड्याचे पर्यटकांना दर्शन

मागील वर्षी म्हणजे २०१३ला मंदिर पाण्याबाहेर आले होते. मागील वर्षी सरासरीपेक्षा पाऊस कमी झाल्यामुळे यंदा मार्च महिन्यातच पळसनाथाचे हे मंदिर पाण्याबाहेर आले असून, यानंतर जून महिन्यापर्यंत पाऊस येईपर्यंत तरी हे मंदिर पाण्याबाहेरच राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
उजनी धरणाचे पाणी ओसरले;  पळसनाथ मंदिरासह इनामदार वाड्याचे पर्यटकांना दर्शन

सोलापूर : उजनी धरणाची पाणी पातळी खालावल्यामुळे तसेच पाणी मोठ्या प्रमाणावर ओसरल्यामुळे उजनी धरणामध्ये लुप्त झालेल्या पळसनाथ मंदिरासह सैराट चित्रपटामधील इनामदार वाडा तसेच ऐतिहासिक पाच पूल आदींचे दर्शन आता पर्यटकांना घडू लागले आहे. सुमारे ४६ वर्षे पाण्याखाली असलेले पळसनाथ मंदिर अद्यापही जैसे तेच असून, पळसदेव दर्शनासाठी भाविक आणि पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होताना दिसून येत आहे.

इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील ग्रामदैवत श्री पळसनाथाचे मंदिर प्राचीन असून, सुमारे ४६ वर्षे हे धरण उजनी धरणाच्या पाण्यात लुप्त झालेले आहे; मात्र ज्या-ज्या वेळी उजनी धरणाचे पाणी ओसरते, त्या - त्यावेळी पळसनाथ मंदिराचे दर्शन सर्वांनाच घडते. याचबरोबर इनामदार वाडा तसेच दगडी पाच पूलदेखील सर्वांच्या नजरेस पडत आहेत. उजनी धरणाची पाणी पातळी घटल्यामुळे पळसनाथ मंदिर पाण्याबाहेर आले असून, मंदिर पाहण्यासाठी पर्यटकांसोबतच अभ्यासक देखील उत्सुकतेने मंदिराकडे जात आहेत. ग्रामदेवतांची प्राचीन मंदिरे असलेल्या पळसदेव ग्रामस्थांनी पुनर्वसनानंतर नव्याने मंदिर बांधले आहे. यामध्ये प्राचीन मंदिरातील मूर्ती शिवलिंगाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. मात्र प्राचीन मंदिराचा ठेवा तसाच ठेवण्यात आला आहे. ४६ वर्षांचा कालावधी उलटून देखील प्राचीन मंदिरे डौलाने उभी आहेत.

उजनी धरणाच्या निर्मितीनंतर १९७८ साली उजनी धरणात प्रथम पाणीसाठा झाल्यानंतर २४ वर्षांनी सन २००२ मध्ये पळसनाथाचे मंदिर बाहेर आले होते. त्यानंतर २०१३ व २०१७ सालात मंदिर पाण्याबाहेर आले आणि मागील वर्षी म्हणजे २०१३ला मंदिर पाण्याबाहेर आले होते. मागील वर्षी सरासरीपेक्षा पाऊस कमी झाल्यामुळे यंदा मार्च महिन्यातच पळसनाथाचे हे मंदिर पाण्याबाहेर आले असून, यानंतर जून महिन्यापर्यंत पाऊस येईपर्यंत तरी हे मंदिर पाण्याबाहेरच राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पळसदेव मंदिरांमधील शिलालेखावरील उल्लेखानुसार हे मंदिर हजार वर्षांपूर्वी बांधण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

४६ वर्षांनंतर दिमाखात उभे

पुणे - सोलापूर महामार्गावरून प्रवास करताना सतत्पभूमीज पद्धतीचे शिखर असलेले हे पळसनाथाचे मंदिर सर्वांच्या नजरेला पडते. चारही बाजूने पाण्याचा वेढा पडलेले मंदिर सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. सभामंडपाची अत्यंत सुरेख आणि देखणी मांडणी, गर्भ गृहामधील कोरीव काम तसेच दगडी खांबांवर उभे ठाकलेले हे मंदिर आजही अत्यंत सुस्थितीत आहे. मंदिराच्या समोरील ओव्यऱ्यांचा काही भाग ढासळला आहे. तसेच मंदिराच्या भोवतालचा तटाचा भाग पाण्याखाली आहे. याशिवाय मंदिराच्या शिला भगनावस्थेत पडल्याच्या दिसत असूनही पळसनाथाचे हे मंदिर मात्र ४६ वर्षानंतर दिमाखात उभे आहे.

logo
marathi.freepressjournal.in