नगरची लढाई एकतर्फीच होणार; निलेश लंके हे मूळ शिवसैनिक, आताचे तिसरे पक्षांतर

पारनेरमध्ये शिवसेनेचे विधानसभा माजी उपाध्यक्ष विजय अवटी यांनी शिवसेना मेळावा घेतला होता. तेथे लंकेने धुडकुस घडून ती सभा उधळण्याचा प्रयत्न केला. त्यावरून त्यांनी त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती.
नगरची लढाई एकतर्फीच होणार; निलेश लंके हे मूळ शिवसैनिक, आताचे तिसरे पक्षांतर

- अरविंद भानुशाली

मतं आणि मतांतरे

दक्षिण नगरमधून शरद पवार राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवलेले निलेश लंके यांचे हे तिसरे पक्षांतर आहे. लंके हे मूळ शिवसेनेचे! त्यानंतर ते राष्ट्रवादीत आले.

पाच नागरसेवकांसह राष्ट्रवादीत (अभंग असतांना) सामील झाले. पुढे राष्ट्रवादीत अजित दादांच्या कृपेने आमदार झाले. अजित पवारांनी राष्ट्रवादी सोडली, तेव्हा निलेश लंके हे अजितदादा गटात सामील झाले. आता त्यांनी अजितदादांची साथ सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत सामील होऊन त्यांनी दक्षिण नगर मधून दंड थोपटले आहेत.

पारनेरमध्ये शिवसेनेचे विधानसभा माजी उपाध्यक्ष विजय अवटी यांनी शिवसेना मेळावा घेतला होता. तेथे लंकेने धुडकुस घडून ती सभा उधळण्याचा प्रयत्न केला. त्यावरून त्यांनी त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती.

दक्षिण नगरचे राजकारण हे क्लीष्ट. यापूर्वी २०१९ मध्ये शरद पवारांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात राजकारण केल्यानंतर विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ सुजय विखे पाटील यांच्या विरोधात तगडा उमेदवार देऊन विरोध केला होता. परंतु सुजयचे त्या मतदारसंघात काम व पूर्व पुण्याईमुळे शरद पवारांच्या समर्थकांचा एकवेळ नाही तर दोन वेळा पराभव झाला. बाळासाहेब विखे पाटील व शरद पवार विरुद्ध खटला हा उभ्या महाराष्ट्रात गाजला. त्यावेळी प्रचार सुरू होता. शरद पवार यांनी 'आम्हाला आज मतदान करा असे उद्गार काढले होते. ते प्रकरण एवढे गाजले की त्यामुळे शरद पवारांविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला. शेवटी सर्वोच्च न्यायालयात काही अटींवर ते सुटले.

आता महायुतीने डॉ सुजय विखे पाटील यांना पुन्हा तिकीट दिले असून त्यांच्या प्रचारार्थ भाजप, शिवसेना शिंदे गट व अजित पवार यांची राष्ट्रवादी एकत्रपणे असतांना लंके किती यशस्वी होतील या बद्दल शंका आहे. एकूण विखे पाटील विरुद्ध शरद पवार हा सामना अनॆक वर्ष चालला आहे. परंतु शरद पवारांना यश मिळालेले नाही.

शरद पवार व विखे पाटील यांचे पूर्वीपासून युद्ध सुरू आहे. शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असतांना एवढेच नव्हे तर अंतुले, विलासराव देशमुखांपर्यंत पवार विरोध होता. १९९९ मध्ये सत्तेसाठी पवारांनी विलासराव देशमुख मंत्रिमंडळात सहभाग घेतला परंतु विखे पवार वाद आता तिसऱ्या पिढी पर्यंत सुरु आहे. विशेष म्हणजे डॉ सुजय विखे हे आता महायुतीचे उमेदवार असल्याने त्यांच्या प्रचारार्थ अजित दादांना जावे लागले. तशी मोर्चे बांधणी व जाहीर सभेची योजनाही देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. पाहूया काय काय होते ते.

logo
marathi.freepressjournal.in