
प्रत्येकजण आपापली गणितं मांडत आहे. आम्ही निकालाची वाट पाहतोय. पण, सध्या जे मुख्यमंत्री आणि त्याचं ४० लोकांचं राज्य आहे, ते पुढील १५ ते २० दिवसांत गडगडल्याशिवाय राहणार नाही,’’ असे भाकित ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
जळगावमधील पाचोऱ्यात ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांची रविवारी सभा होती. त्यासाठी येथे आलेल्या संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले. संजय राऊत म्हणाले, ‘‘हे सरकार फेब्रुवारी महिन्यापर्यंत टिकेल, असे मी आधीच बोललो आहे. आता न्यायालयाचा निकालच उशीरा लागतोय, पण हे सरकार टिकत नाही. या सरकारचा मृत्युलेख लिहिला गेला आहे. डेथ वॉरंट निघालं आहे. आता फक्त सही कुणी करायची, हे ठरलं आहे,” असं भाकित संजय राऊत यांनी केलं.
सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा, तसेच राज्यपालांनी दिलेले सत्ता स्थापनेचे निमंत्रण आणि इतर मुद्द्यांवरील याचिकांवर सुनावणी पूर्ण झालेली आहे. आता सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठाच्या निकालाचीच प्रतिक्षा आहे. महाराष्ट्राच्या आणि दिल्लीतील सरकारच्या नजरा या निकालाकडे लागलेल्या आहेत. हा निकाल मे महिन्याच्या मध्याआधी लागण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी भाकित केलं आहे.
शिंदे गटाच्या आमदारांची बैठक
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षाच्या आमदारांची रविवारी बैठक बोलावली होती. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ही बैठक झाली असून बैठकीचा तपशील कळू शकलेला नाही. या बैठकीला खासदार, आमदार, मंत्री आणि मुख्य पदाधिकारी उपस्थित होते. ही बैठक का बोलावण्यात आली, याबाबतचं कारण अस्पष्ट आहे. मात्र या बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक विषयावर चर्चा झाल्याचे कळते.
‘त्यांना’ पक्षाची दारे बंद
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी, ‘पुन्हा महाविकास आघाडी सरकार येईल आणि जे आमदार गेले आहेत, ते परत येतील.’ असे विधान केले होते. यावर भाष्य करताना राऊत म्हणाले, “येऊ शकतात. पण, जे निघून गेले त्यांना परत शिवसेनेत प्रवेश मिळणार नाही. जे गेले, ते गेले. वो अब भगवान को प्यारे हो गये.”