काँग्रेस आंदोलनानंतर वाहनांना टोलमाफी

कराड येथून जात असलेल्या पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कराड तालुक्यातील तासवडेतील टोलनाक्यावर शनिवारी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
काँग्रेस आंदोलनानंतर वाहनांना टोलमाफी
Published on

रामभाऊ जगताप/कराड

कराड येथून जात असलेल्या पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कराड तालुक्यातील तासवडेतील टोलनाक्यावर शनिवारी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी पावणेतीन वाजेपर्यंत करण्यात आलेल्या आंदोलनास यश मिळाले असून महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनीकडून तासवडे टोलनाका परिसरातील २० किलोमीटर अंतरातील सर्व गावांना टोल सवलत देण्यात आली आहे. तसेच तासवडे टोलनाक्यावरून जाणाऱ्या देशभरातील सर्व वाहनांना २५ टक्के टोल माफी जाहीर केली असून त्याचबरोबर आणखी २५ टक्के टोल माफी मिळावी, यासाठी महामार्ग प्राधिकरणाकडून वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तासवडे टोलनाक्यावर करण्यात आलेल्या आंदोलनास आमदार विश्वजीत कदम यांच्यासह सातारा व सांगली जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तासवडे टोल नाक्यावर सुमारे साडेपाच तास आंदोलन करत वाहने विना टोलची सोडून देण्यात आली.

विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सकाळी दहा वाजल्यापासून तासवडे टोल नाका परिसरात स्वतः ठाण मांडून साडेपाच तास आंदोलन केले. यावेळी जोपर्यंत तोल माफीचा निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत आंदोलन केले. यावेळी महामार्ग प्राधिकरणाकडून आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना लेखी आश्वासन देण्यात आले आणि त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. टोलमाफीच्या मागणीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत महामार्गावर वाहने अडविली होती.

यावेळी काँग्रेसचे सांगली शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासह काही काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. काही वेळानंतर त्यांची सुटका करण्यात आली.

५०% सवलतीसाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार

शेखर धोंगडे/ कोल्हापूर : टोल माफीवरून काँग्रेसने पुकारलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. राष्ट्रीय महामार्गावरील पुणे ते कोल्हापूर दरम्यानचा रस्ता जोपर्यंत सुस्थितीत होत नाही तोपर्यंत, २५% टोल सवलत देण्यात येणार आहे. याशिवाय २० किलोमीटर गावातील वाहनधारकांना टोल माफी असणार आहे. तर ५० टक्के टोल सवलत देण्याबाबतचा प्रस्ताव येत्या एक महिन्याच्या आत केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. याबाबत लेखी आश्वासन मिळाल्यानंतर काँग्रेसने आंदोलन स्थगित केले आहे. या आश्वासनांची पूर्तता न झाल्यास, पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशाराही आमदार सतेज पाटील यांनी दिला आहे. काँग्रेसच्या या आंदोलनाची दखल घेत, रस्त्यांची जोपर्यंत दुरुस्ती होत नाही तोपर्यंत टोलमध्ये २५% टोल सवलत देण्यात येणार आहे. तसेच टोल नाक्यापासून २० किलोमीटर गावातील नागरिकाना टोल माफी असणार आहे. तसेच ५० टक्के टोल माफीचा प्रस्ताव येत्या एक महिन्यामध्ये केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. त्याशिवाय सर्व्हिस रोडवरील खड्डे पंधरा दिवसात बुजविण्यात येणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in