राज्यात बारावी निकाल, विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण ; वाचा विभागानुसार आकडेवारी

यंदाही मुलींनीच बाजी मारली असून मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९५.३५ इतकी आहे. तर मुलांची ९३.२३ टक्के इतकी आहे
File Photo
File PhotoANI

राज्याचा बारावीचा निकाल ९४.२२ टक्के लागला आहे. यावर्षीही राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक म्हणजेच ९७.२१ टक्के निकाल लागला आहे, तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा ९०.९१ टक्के एवढा लागला आहे. दरम्यान, यंदाही मुलींनीच बाजी मारली असून मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९५.३५ इतकी आहे. तर मुलांची ९३.२३ टक्के इतकी आहे. मुलांपेक्षा २.०६ टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी मंडळाने जाहीर केला.

बारावीचा निकाल कधी जाहीर होतो, याची प्रतीक्षा पालक, विद्यार्थ्यांना लागून राहिली होती. मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केला. यंदा नऊ विभागीय मंडळातून एकूण सात लाख ९१ हजार ६५४ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी सात लाख ८६ हजार ६९९ विद्यार्थी प्रत्यक्ष प्रविष्ट झाले. त्यापैकी सात लाख ३६ हजार ६९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ९३.२९ टक्के इतकी आहे. तसेच यंदा नऊ विभागांतून सहा लाख ५८ हजार १० विद्यार्थिनींनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी सहा लाख ५३ हजार २७६ विद्यार्थिनी प्रत्यक्ष प्रविष्ट झाल्या आणि त्यापैकी सहा लाख २८ हजार ९०५ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींची टक्केवारी ९५.३५ टक्के इतकी आहे.

राज्यातील नऊ विभागांतून मुले आणि मुली मिळून एकूण १४ लाख ४९ हजार ४६४ नियमित विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १४ लाख ३९ हजार ७३१ विद्यार्थी प्रत्यक्ष प्रविष्ट झाले. त्यापैकी १३ लाख ५३ हजार ६०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, राज्याचा निकाल ९४.२२ टक्के इतका लागला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा होणार की नाही, ऑनलाइन होणार की ऑफलाइन होणार, याबाबत संदिग्धता होती; मात्र शासन, विद्यार्थी, पालक यांच्या सहकार्यामुळे मंडळ ऑफलाइन परीक्षा घेऊ शकले, असे मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना त्यांच्या मानसिकतेचा विचार करून लेखी परीक्षेसाठी अर्धा तास वाढवून देण्यात आला होता, तसेच त्यांना होम सेंटर देण्यात आले होते. याबरोबरच लेखी परीक्षेसाठी २५ टक्के तर प्रात्यक्षिक परीक्षेसाठी ६० टक्के अभ्यासक्रम कमी करण्यात आला होता. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारलेली दिसते आहे, असे गोसावी यांनी सांगितले.

राज्यात परीक्षा काळात एकूण २४२ गैरप्रकार (कॉपी) आढळून आले असून, एकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेत हे प्रमाण ०.०१६ टक्के इतके असल्याचे गोसावी यांनी नमूद केले. तसेच राज्यात तोतया परीक्षार्थींचे पाच प्रकार घडले असून, पैकी चार मुंबई आणि एक पुण्यात घडला असल्याचेही त्यांनी सांगितले. पुन:परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा निकाल ५३.०२ टक्के दरम्यान, या नऊ विभागांतून ३५ हजार ५२७ पुन:परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३५ हजार ३६८ विद्यार्थी प्रत्यक्ष प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १८ हजार ७५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामुळे पुन:परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा निकाल ५३.०२ टक्के इतका लागला आहे. नियमित आणि पुन:परीक्षार्थी एकूण विद्यार्थ्यांचा निकाल ९३.२३ टक्के नियमित आणि पुन:परीक्षार्थी असा एकूण विद्यार्थ्यांचा विचार करावयाचा झाल्यास नऊ विभागांतून एकूण १४ लाख ८५ हजार १९१ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १४ लाख ७५ हजार ९९ विद्यार्थी प्रत्यक्ष प्रविष्ट झाले. त्यापैकी १३ लाख ७५ हजार ३५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यांची टक्केवारी ९३.२३ टक्के इतकी आहे.

विभागनिहाय निकाल (टक्के)

कोकण -९७.२२

नागपूर- ९६.५२

अमरावती- ९६.३४

लातूर- ९५.२५

कोल्हापूर - ९५.०७

नाशिक - ९५.०३

औरंगाबाद - ९४.९७

पुणे - ९३.६१

मुंबई - ९०.९१

शाखानिहाय निकाल (टक्के)

विज्ञान – ९८.३०

कला - ९०.९१

वाणिज्य - ९१.७१

व्यवसाय अभ्यासक्रम - ९२.४०

आयटीआय - ६६.३९

विभागनिहाय ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या

पुणे - १,७३१

नागपूर - १,०४६

औरंगाबाद - ८१०

मुंबई - २,७६६

कोल्हापूर - ५९३

अमरावती - १,७८३

नाशिक - ६१२

लातूर - ५६३

कोकण - १३८

राज्यात ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या – १०,०४

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in