आज भगतसिंग कोश्यारी यांचा राज्यपाल पदाचा राजीनामा मंजूर झाला. यामध्ये राज्यभरातून अनेक प्रतिक्रिया समोर आल्या. यामध्ये आता खासदार उदयनराजे भोसले यांनीदेखील प्रतिक्रिया देत म्हंटले की, "हा निर्णय घेण्यास उशीरच झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधाने करणाऱ्यांची योग्यता काय?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यात अनेक लोक कल्याणकारी निर्णय घेतले. त्यांनी लोकशाहीची चौकट तयार केली. कारण, लोकांचा राज्य कारभारामध्ये सहभाग असावा आणि त्यातूनच मग लोकशाहीची निर्मिती झाली" असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले की, "जसे राष्ट्रपती देशाचे प्रमुख असतात, तसेच राज्यपालही राज्याचे प्रमुख असतात. अशा महत्वाच्या पदावर असणाऱ्या व्यक्तींनी महापुरुषांबद्दल जबाबदारीने विधाने करणे अपेक्षित असते. महापुरुषांबद्दल वाईट बोलले तर लोकांच्या भावना दुखावल्या जातात. जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण होते. हे सगळे कशासाठी? महापुरुषांबद्दल बोलण्याची त्यांची विचारांची व्याप्ती संकुचित आहे. शिवाजी महाराजांनी संपूर्ण देशाला आपले कुटुंब मानले. पण, आता अलीकडच्या काळात काही लोकांमध्ये अहंकार निर्माण झाला आहे. स्वत:चे व्यक्तीमत्व नसताना ते वाढवण्याचे काम करत आहेत. एक ते भगतसिंग होते, ज्यांनी देशासाठी प्राण पणाले लावले आणि दुर्दैवाने सांगावे वाटते एक हे भगतसिंग कोश्यारी आहेत." असे म्हणत त्यांनी भगतसिंग कोश्यारींना टोला लगावला.