

शिर्डी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आपण "शुभचिंतकच" आहोत आणि त्यांच्या पंतप्रधानापदाच्या इच्छेलाही पाठिंबाच देऊ असे शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी सोमवारी येथे स्पष्ट केले. शिर्डी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले की,"जर त्यांना (फडणवीस) मी त्यांचा शत्रू वाटत असेन, तर मी तसा नाही, मी त्यांचा शुभचिंतक आहे. मी त्यांच्या 'मन की बात'बद्दल बोलत आहे. २०२९ च्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीस यांचे नाव येऊ नये, यासाठी पडद्यामागून काही हालचाली सुरू आहेत याचा पुनरुच्चार करून ते म्हणाले की,"महाराष्ट्रातील एखादी व्यक्ती जर पंतप्रधान होणार असेल, तर माझ्या पक्षाने त्यांच्यासोबत का नसावे?" मात्र, फडणवीस यांनी स्वतःहून पंतप्रधानपदाच्या महत्त्वाकांक्षेची घोषणा केली, तर ते त्यांच्याच पक्षात राजकीय आत्महत्या करण्यासारखे ठरेल, असेही ठाकरे यांनी नमूद केले.
"जर फडणवीस यांनी आपण पंतप्रधानपदासाठी तयारी करत आहोत, असे जाहीर केले, तर ते पक्षात टिकतील का?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
शिर्डीत टोलेबाजी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आणि नुकतेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केलेले खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावरही ठाकरे यांनी निशाणा साधला. "वाकचौरे ज्या पक्षात गेले, त्या पक्षाची सत्ता गेली आहे," असा टोला त्यांनी लगावला.
तसेच, शिर्डी दौऱ्यादरम्यान आपण साईबाबांच्या चरणी देवेंद्र फडणवीस यांची 'खुर्ची' सुरक्षित राहावी, अशी प्रार्थना केल्याचेही ठाकरे यांनी उपरोधिकपणे सांगितले. यावेळी बोलताना त्यांनी केंद्र सरकारवरही गंभीर आरोप केले. शिवसेना (यूबीटी) मधील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्यामागे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा हात असल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला.