"मोदी...तेवढी तुमची लायकी नाही..." नाशिकच्या सभेतून उद्धव ठाकरेंचं पंतप्रधानांवर टीकास्त्र

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपाला हात लावायची सोडा, त्याचं दर्शन घ्यायचीही नरेंद्र मोदी यांची लायकी नाही,
उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका
उद्धव ठाकरेंची मोदींवर टीकाप्रातिनिधिक फोटो

नाशिक: लोकसभा निवडणूकीच्या पाचव्या टप्पासाठी राज्यात २० मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहेत. शिवसेना उबाठा आणि महाविकासआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंनी नाशिकमध्ये जाहीर सभा घेतली. या सभेतून उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्र सोडलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपाला हात लावायची सोडा, त्याचं दर्शन घ्यायचीही नरेंद्र मोदी यांची लायकी नाही, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली

त्यांच्या मनावर ताण पडलाय, ठाकरेंनी मोदींना डिवचलं...

उद्धव ठाकरे म्हणाले की, "मोदी आज नाशिकमध्ये होते. आता त्यांच्या मनावर ताण पडलाय. मध्यंतरी कोणीतरी सांगितलं होतं की, मोदीजी झोपतच नाहीत. पण डॉक्टर असं सांगतात की, झोपलं नाही की मेंदूवर परिणाम होतो आणि लोकं भ्रमिष्टासारखे बोलू लागतात."

मोदीजी तेवढी तुमची लायकी नाहीये...

उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून म्हणाले की, मोदीजी तुम्हाला कदाचित कल्पना नसेल की, स्वतः हिंदुहृदयसम्राटांनी शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. पण काही पावटे आपल्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणाले. तेलंगणांच्या भाषणात मला नकली संतान म्हणालेत.

उद्धव ठाकरे पुढं म्हणाले की, "नरेंद्र मोदीजी मी माझं बर्थ सर्टीफिकेट तुमच्याकडे मागितलं नाही आणि तेवढी तुमची लायकीपण नाहीये. तुम्ही ब्रह्मदेवाचा अवतार नाही. तुम्ही माझं सारं चोरलं. चोराच्या हाती धनुष्य दिलं, पण मशाल बघा कशी पेटलीये."

राजकारणामध्ये भाजपला पोरंच होत नाहीत. म्हणून त्यांना नकली संतानं आणि आपल्याकडचेही गद्दार मांडीवर घ्यावे लागले, असं उद्धव ठाकरे म्हणाले. ७० हजार कोटींचा उपमुख्यमंत्री, तर मुख्यमंत्री कितीचा असेल? असा खोचक सवालही त्यांनी उपस्थितीत केला.

जिरेटोपाचं दर्शन घेण्याचीही तुमची लायकी नाही...

काल प्रफुल पटेलांनी नरेंद्र मोदींच्या डोक्यात जिरेटोप घातला होता. यावरून उद्धव ठाकरेंनी प्रफुल पटेलांना चांगलंच झापलं. काल महाराजांचा जिरेटोप, आज शेतकऱ्यांची गांधी टोपी...रोज टोप्या बदलणारा माणूस देशाचा पंतप्रधान तुम्हाला पाहिजे? असा प्रश्न त्यांनी लोकांना विचारला.

ठाकरे म्हणाले की, "प्रफुल पटेल तुम्ही वाटेल त्याच्या डोक्यात महाराजांचा जिरेटोप घालू नका. तुम्ही प्रफुल पटेल असला तरी महाराष्ट्र तुम्हाला आपटेल. कोणाच्या डोक्यांवर तुम्ही जिरेटोप ठेवताय? मोदींच्या? महाराजांची बरोबरी करायची त्यांची पात्रता आहे का? शिवाजी महाराजांना आम्ही दैवत मानतो. त्यांचं राज्य कसं चालत होतं? कुणी महिलेवर अत्याचार केला तर जिथल्या तिथं त्याचे हातपाय तोडायचे, मग तो रांझाचा पाटीला असो वा कुणी असो....आणि मोदी काय करतायत...मनिपूरमध्ये महिलांची धिंड निघाली, तिकडे जातच नाहीत. मोदी आणि शहांची तिकडे जायची हिंमतच नाही. जिथे शिवराय महिलेवर अत्याचार केल्यास शिरच्छेद करायचे आणि तुम्ही तिथे (मनिपूर) जाऊ पण शकत नाही...महाराजांचा जिरेटोप हात लावायची काय त्याचं दर्शन घ्यायचीही मोदी तुमची लायकी नाही."

हा छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राचा अपमान-

"बरं ते कुणाचा प्रचार करतायत..इकडं जो उमेदवार आहे त्याचे व्हिडीओ फिरतायत. असा ज्यांचा उमेदवार आहे, तो महाराजांचा जिरेटोप घालू शकतो? कर्नाटकामध्ये प्रज्वल रेवण्णा, महिलांवर अत्याचार करणारा माणूस, बलात्काराचे व्हिडीओ काढणारा माणूस मोदी निर्लज्जपणे सांगतायत रेवण्णाला मत म्हणजे मोदींना मत..यांची आणि महाराजांची बरोबरी होऊ शकते? हा छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राचा अपमान आहे."

प्रफुल पटेलांना कळलं...

प्रफुल पटेल आज म्हणाले, छत्रपतींचा अपमान करायची आमची इच्छा नव्हती, पण यापुढे दक्षता घेऊ...म्हणजे तुम्हाला कळलंय की तुम्ही ज्यांच्या डोक्यात महाराजांचा जिरेटोप घातला, ते डोकं त्या लायकीचं नाही..

logo
marathi.freepressjournal.in