
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज हिंगोली येथे घेतलेल्या निर्धार सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर चांगलाच निशाणा साधला. 'शासन आपल्या दारी, थापा मारतो लय भारी' अशा खोचकशब्दात उद्धव ठाकरे यांनी राज्यकर्त्यांना टोला लगावला. यावेळी बोलताना त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवातच सत्ताधाऱ्यांवर टीका करुन केली. सरकार आपल्या दारी म्हणत असून, योजना फक्त कागदारवरी, असंही ते म्हणाले.
काही जणांना मी गद्दारांवर बोलेल अशी अपेक्षा असेल, पण मी गद्दारांवर बोलून वेळ वाया घालवणार नाही. मी तुम्हाला भेटण्यासाठी आलो असून त्यावरच बोलणार असल्याचं ते म्हणाले. मागे नागपंचमी गेली. आपण या गद्दाराला दुध पाजलं पण त्याने पलटून चावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अशा सापांना पायाखाली ठेचलं पाहिजे, म्हणत त्यांनी संतोष बांगर यांच्यावर हल्लाबोल केला.
हे तर नामर्द
राज्य सरकार आणि भाजप सरकारवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, हे डबल इंजिन सरकार आणि आता अजित दादांचा एक डबा लागला आहे. अजून किती डबे लागणार आहेत? तुम्हाला माझे नेते, वडील लागतात. पक्ष फोडला, पक्ष सोडा वडिल माझे वापरायचे. का तुमच्या दिल्लीतील वडिलांकडे मते मागयची हिंमत राहिली नाही? माझे वडील चोरणार, इतर पक्षातील नेते चोरणार आणि म्हणतात आम्ही हिंदू आहोत. अरे कसले हिंदू, याला नामर्द म्हणतात. ही नामर्दांगी आहे, अशी जहरी टीका उद्वव ठाकरे यांनी केली.
फडणवीसांवर साधला निशाणा
हिंगोलीतील सभेत उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला. ते म्हणाले की, फडणवीस यांना मी बोलण सोडलं आहे. मागे मी त्यांना कलंक बोललो, त्यांना फडतूस बोललो तर बोभाटा झाला. आता मी त्यांना थापाड्या म्हणणार होतो. पण त्यांना आता थापाड्या म्हणत नाही. असं म्हणत त्यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली. तसंच "राज्यात दुष्काळ आहे आणि फडणवीस जपानमध्ये आहेत. टरबूजालाही पाणी लागलं" असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे फडणवीस यांचा टरबूज असा उल्लेख केला.