"न्यायमूर्तीच आरोपीच्या घरी जाऊन भेटत असतील तर कोणत्या निकालाची अपेक्षा करायची", उद्धव ठाकरेंचा सवाल

ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळणे सुरु आहे. त्यामुळे लोकशाहीचा खून होतो आहे का? अशी शंका निर्माण झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.
"न्यायमूर्तीच आरोपीच्या घरी जाऊन भेटत असतील तर कोणत्या निकालाची अपेक्षा करायची", उद्धव ठाकरेंचा सवाल

शिवसेनेच्या 16 आमदारांचे अपात्रता प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कोर्टात आहे. सुप्रीम कोर्टाने नार्वेकरांना योग्य वेळत निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर न्यायालयाने त्यांना सुरुवातील 31 डिसेंबर आणि नंतर 10 जानेवारीची मुदत दिली. अशात नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा या शासकीय निवास्थानी जाऊन भेट घेतल्याने ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी यावर आक्षेप घेतला आहे. विधानसभा अध्यक्ष वर्षा बंगल्यावर कसे जातात? यांची काही मिलीभगत आहे का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. या भेटीवर आक्षेप घेत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.

वेळकाढूपणा सुरु-

देशात लोकशाही जिवंत राहणार की नाही हे ठरवणारा हा खटला आहे. त्यावर गेली दोन वर्ष चर्चा, सुनावणी, उलटतपासणी सुरु आहे. गेल्या एप्रिलमध्ये सर्वोच्च न्यायालयाने योग्य वेळेत निकाल लावाला असे म्हटले होते. न्यायालयाने 31 डिसेंबरची तारीख दिली होती. या प्रकरणाची ज्या प्रकारे सुनावणी सुरु होती तेव्हाच आमच्या लक्षात आले होते की ते वेळकाढूपणा करत आहेत. उद्या दहा जानेवारीला ते 11:59 वाजेपर्यंत खेचतील मग निकाल देतील असे वाटते, असेही ठाकरे म्हणाले.

...तर कोणत्या निकालाची अपेक्षा करायची?

लवाद म्हणून विधानसभा अध्यक्षांनी दोनवेळा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. विधानसेभेचे अध्यक्ष असे मुख्यमंत्र्यांना भेटू शकतात का? याचा अर्थ न्यायमूर्ती आरोपीला जाऊन भेटले आहेत असे झाले. एकनाथ शिंदे हे आमच्या दृष्टीने आरोपीच आहेत. न्यायमूर्तीच आरोपीला घरी जाऊन भेटत असतील तर कोणत्या निकालाची अपेक्षा करायची? असा आमच्या जनतेच्या न्यायालयात प्रश्न आहे. ज्येष्ठ कायदेतज्ञ उल्हास बापट यांच्याशी आम्ही चर्चा केली. त्यांच्या मते दोन महिन्यात ज्या खटल्याचा निकाल लागायला हवा होता त्यात दोन वर्षे काढली. ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळणे सुरु आहे. त्यामुळे लोकशाहीचा खून होतो आहे का? अशी शंका निर्माण झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.

आमची अपेक्षा सर्वोच्च न्यायालयाकडून-

आमची अपेक्षा सर्वोच्च न्यायालयाकडून आहे. तसेच, जनतेच्या न्यायालयातही आम्ही हा विषय मांडायचा म्हणून तुम्हाला सांगतो. सध्याचे सरकार हे बेकादेशीर सरकार आहे. जे दोन वर्षे महाराष्ट्रावर राज्य करत आहे. जी गोष्ट लोकशाहीसाठी घातक आहे. ज्या गोष्टीचा निकाल उघडपणे लागायला हवा होता त्यासाठी दोन वर्षे काढली. उद्याही वेळकाढूपणा केला जाईल. पुढची तारीख मिळेपर्यंत निवडणुका होऊन जातील, असेही ठाकरे म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in