उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात झाला! शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचे प्रतिपादन

‘मी ठाकरे कुटुंबीयांच्या विनंतीनुसार येथे आलो. त्यांनी माझे स्वागत केले. आम्ही सर्वजण हिंदू धर्म व सनातन धर्म पालन करणारे आहोत. आपल्याकडे पाप-पुण्याची भावना सांगण्यात आली आहे. गोहत्या हे सर्वात मोठे पाप आहे. पण त्याहून मोठा...
उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात झाला! शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचे प्रतिपादन
पीटीआय
Published on

मुंबई : ‘मी ठाकरे कुटुंबीयांच्या विनंतीनुसार येथे आलो. त्यांनी माझे स्वागत केले. आम्ही सर्वजण हिंदू धर्म व सनातन धर्म पालन करणारे आहोत. आपल्याकडे पाप-पुण्याची भावना सांगण्यात आली आहे. गोहत्या हे सर्वात मोठे पाप आहे. पण त्याहून मोठा घात हा ‘विश्वासघात’ आहे. हाच घात उद्धव ठाकरे यांच्यासोबत झाला आहे. ही वेदना अनेकांच्या मनात आहे. ही वेदना उद्धव ठाकरे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होईपर्यंत दूर होणार नाही’, असे प्रतिपादन शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी पत्रकारांशी बोलताना केले.

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेवर बहिष्कार घालणारे ज्योतीर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी सोमवारी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी ठाकरे यांनी कुटुंबीयांसह पादुका पूजन करून त्यांचे आशीर्वाद घेतले.

अविमुक्तेश्वरानंद यांनी यावेळी आमचेच हिंदुत्व खरे या एकनाथ शिंदे व भाजपच्या दाव्याचाही समाचार घेतला. कुणाचे हिंदुत्व खरे आहे हे माहिती करून घ्यावे लागेल. पण विश्वासघात करणारा हिंदू नसतो. पण विश्वासघात सहन करणारा मात्र निश्चितच हिंदू असतो. त्यामुळे विश्वासघात करणारे कसे हिंदू असतील? उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात झाला. महाराष्ट्रातील समस्त जनतेला ही वेदना आहे. निवडणुकीतही ही गोष्ट सिद्ध झाली आहे. सरकार पाडून जनमताचा अनादर करणे ही चांगली गोष्ट नाही, असे ते म्हणाले. शंकराचार्यांचे ठाकरे कुटुंबीयांनी जोरदार स्वागत केले. उद्धव यांनी पत्नी रश्मी तथा आदित्य व तेजस या दोन्ही मुलांसह पादुका पूजन करून अविमुक्तेश्वरानंद यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्यांनी त्यांच्याशी संवादही साधला. भेटीनंतर मातोश्रीबाहेर पडल्यानंतर अविमुक्तेश्वरानंद यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात झाल्याचा आरोप केला.

पाप व पुण्य हा धर्माचा मुद्दा

आम्हाला राजकारणाचे कोणतेही देणेघेणे नाही. पण जे सत्य आहे ते आम्हाला सांगावेच लागेल. आपल्याकडे विश्वासघात पाप मानले जाते. पाप व पुण्य हा धर्माचा मुद्दा आहे. त्यावर राजकारणी नाही तर केवळ धर्माचार्यच बोलू शकतात, असेही अविमुक्तेश्वरानंद यांनी स्पष्ट केले. केदारनाथ येथून २२८ किलो सोने गायब झाले. पण मीडिया ते दाखवत नाही. त्याचा तपासही केला जात नाही. आता दिल्लीत केदारनाथ बांधून घोटाळा करण्यात येत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

logo
marathi.freepressjournal.in