संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत अजून भर पडली आहे. राज्याला पुन्हा एकदा गारपीटसह आलेल्या अवकाळी पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. अवेळी पडलेल्या या पावसाने हातातोंडाशी आलेल्या घास हिरावून नेला आहे. विदर्भातील बहुतांश भागात शेतीपीकांचं मोठं नुकसान झालं आहे. विशेषता विदर्भातील हरभरा, तूर सोयाबीन, कापूस गहू इत्यादी पिकांना मोठा फटका बसला आहे. नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने विदर्भात पुढील दोन दिवस येलो अलर्ट जारी केला आहे. यामुळे शेतकऱ्यांवर घोंगावणारं हे संकट आणखी गडद होण्याची शक्यता आहे. खबरदारी म्हणून शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेण्याच्या सुचना हवामान खात्याकडून करण्यात आल्या आहेत.
काल पडलेल्या अवकाळी पावसामुळे विदर्भातील कापूस पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. तर काही ठिकाणी शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढवलं आहे. दमदार पावसाने शेतीतील नेटशेडचे मोठं नुकसान केलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील बहुतांश भागात शेतातील नेटशेड कोसळले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचं नुकसान झालं आहे. बुलढाण्यातील १३ ही तालुक्यात रात्रीपासून पाऊस सुरु झाला असून हवेत प्रतंड गारवा निर्माण झाला. अचानक बदललेल्या हवामानाना आरोग्यावर देखील विपरित परिणाम झाला. यामुळे सर्दी ताप यासारख्या आजाराने नागरिक हैरान झाले आहेत.
हिंगोलीत कापूस उत्पादक शेतकरी रात्री झालेल्या पावसात चांगलेच झोडपले गेले. वेजनीला आलेला कापूस भीजला गेल्याने मोठं नुकसान झालं. यंदा पावसाळ्यात पाऊस चांगला झाला नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या कष्टाने पीक जगवलं होतं. मात्र रात्रीच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे.
वाशिम जिल्ह्यातील मनोरा तालुक्यातील चिस्ताळा गावात एका झाडावर शेकडो बगळी आश्रय घेत होते. काल अचानकपणे मुसळधार पाऊस झाल्याने या बगळ्यांचा नाहक बळी त्यात गेला आहे. विजांच्या कडकटामुळे जवळपास शंभत ते दीडशे बगळ्यांचा मृचत्यू झाल्याची धक्कादायक घडना उघडकीस आली आहे. याच बरोबर नंदुरबारमधील मिरची व्यापाऱ्यांना देखील या पावसाचा फटका बसला आहे. नंदुरबार येथील शेतकऱ्यांकडून खरेदी केलेली २० ते २५ हजार क्विंटल मिरची पाण्यात भिजली असून ती खराब होण्याची शक्यता आहे. यात अंदाजे ३० टक्के जरी मिरची खराब झाली तरी २ ते ३ कोटी रुपयांचं नुकसान होण्यााच अंदाज आहे.
नाशिकमध्ये देखील अवकाळी पावसाने मोठं थैमान माजवलं आहे. नाशिकमधील द्राक्षांच्या बागा आणि कांद्याचं पीक यामुळे पूर्णपणे उधवस्त झालं आहे. काल रात्री झालेल्या पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. यामुळे शासनाकडून मदतीची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.