गडचिरोली जिल्ह्यात २५ हजार हेक्टर क्षेत्रावर शेतीचे नुकसान झाले असून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पाऊण लाख रुपयांची मदत करावी आणि ज्या १२ लोकांनी जीव गमावला आहे, त्यांच्या कुटुंबीयांना भरीव मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारकडे केली आहे. अतिवृष्टी झालेल्या गडचिरोली जिल्ह्यांतील सिरोंचा, भामरागड आणि अहेरी भागातील गावांची पाहणी गुरुवारी अजित पवार यांनी केल्यानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.
अतिवृष्टीत जे नुकसान झाले आहे त्याची सगळी माहिती यावेळी घेतल्याचे सांगितले. शेतकऱ्यांच्या घरांचे नुकसान झाले आहे. पंचनामे करताना ज्या घरांना ओलावा आला आहे, त्यांचाही समावेश करावा, अशी विनंती अजित पवार यांनी सरकारला केली आहे.
साधारण या भागात दहा लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यामध्ये गडचिरोलीमध्ये २५ हजार हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे. धान आणि पिकांवर शेतकऱ्यांचा संसार अवलंबून होता, त्यासाठी त्याला वर्षभर जगण्याकरीता संघर्ष करावा लागणार आहे, त्यामुळे साधारण पाऊणलाख हेक्टरी ज्यांचे पीक उध्वस्त झाले त्यांना तातडीने सरकारने मदत दिली पाहिजे,असेही अजित पवार म्हणाले.
शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ जाहीर करण्याची तातडीची गरज आहे. तातडीने अधिवेशन घेण्याचीही गरज आहे. पावसाळी अधिवेशन व्हायला विलंब होतो आहे ही वस्तुस्थिती आहे.