सध्या लोकांच्या समस्यांपेक्षा ऐतिहासिक मुद्यांवर भर; भूषणसिंह राजे होळकर यांची टीका

रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा विषय हा कोणत्याही एका समाजाचा नाही. मात्र, महाराष्ट्रात प्रत्येक विषयाला जातीय रंग दिला जातो, हे दुर्दैवी आहे.
सध्या लोकांच्या समस्यांपेक्षा ऐतिहासिक मुद्यांवर भर; भूषणसिंह राजे होळकर यांची टीका
Published on

पुणे : रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा विषय हा कोणत्याही एका समाजाचा नाही. मात्र, महाराष्ट्रात प्रत्येक विषयाला जातीय रंग दिला जातो, हे दुर्दैवी आहे. इतिहासाच्या आधारे सत्य बाहेर यावे आणि कोणाच्याही भावना दुखावल्या जाऊ नयेत, यासाठी शासनाने मध्यस्थी करावी, अशी त्यांनी विनंती केली. महाराष्ट्रात सध्या लोकांच्या समस्यांपेक्षा ऐतिहासिक मुद्यांवर भर दिला जात आहे, त्यामुळे समाज एकमेकांच्या विरोधात उभा राहतोय, अशी टीका भूषणसिंह राजे होळकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.

रायगडावरील श्वानाच्या स्मारकावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सरकारने सखोल चौकशी करण्यासाठी इतिहास अभ्यासकांची समिती नेमावी. त्या समितीत संजय सोनवणी आणि इंद्रजित सावंत यांच्यासारख्या अभ्यासकांना घ्यावे. जेणेकरून ऐतिहासिक सत्य समोर येईल, अशी मागणी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांनी केली. रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याच्या शिल्पावरून सध्या राज्यातील राजकारण तापले आहे. वाघ्या कुत्र्याच्या अस्तित्वाबाबत कोणतेही ठोस असे ऐतिहासिक पुरावे नसल्याने ते शिल्प तिथून हलवावे, अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्र पाठवून केली आहे. मात्र यानंतर या शिल्पाच्या वादाला जातीय वळण दिले जात असल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर होळकरांचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

होळकरांनी रायगडावरील शिव समाधीसाठी मोठा निधी दिला होता. तुकोजी होळकर यांनी शिवस्मारकासाठी योगदान दिले, त्याच्या स्पष्ट नोंदी उपलब्ध आहेत. वाघ्या कुत्र्याचा प्रश्न निर्माण झाला आहे की, होळकरांनी दिलेल्या निधीवरच वाद घातला जात आहे? असा सवालही त्यांनी केला.

होळकर कधीही इंग्रंजांसमोर झुकले नाहीत

होळकर कधीही इंग्रजांसमोर झुकले नाहीत. त्यामुळे, होळकर इंग्रजांना घाबरत होते असे वक्तव्य करणाऱ्यांचा इतिहास किती खोल आहे, हे तपासून पाहणे गरजेचे आहे. संभाजी ब्रिगेडसारख्या संघटनांना आळा घालण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत त्यांनी यावेळी मांडले. येत्या ३१ मे रोजी अहिल्याबाई होळकर यांची ३०० वी जयंती आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय हेतूने कोणीही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. आमच्या घराण्याने शिवरायांसाठी दिलेल्या योगदानाचा योग्य सन्मान व्हावा. तुकोजी होळकर यांच्या स्मरणार्थ रायगडावर फलक लावावा. अहिल्यादेवींच्या जयंतीला गालबोट लागू नये, अन्यथा तीव्र विरोध होईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. मुख्यमंत्र्यांनी तातडीने सगळ्या संघटनांना समज द्यावी आणि हा वाद योग्य पद्धतीने सोडवावा, असेही भूषणसिंह राजे होळकर यांनी नमूद केले.

मुख्यमंत्र्यांना भेटणार

मुख्यमंत्र्यांना भेटून हा संपूर्ण विषय मांडणार आहे. तसेच, ताराराणीच्या समाधीच्या संवर्धनावर भर द्यावा, औरंगाबादच्या कबरीपेक्षा हा मुद्दा महत्त्वाचा आहे. राजकीय हेतूने कोणीही ऐतिहासिक सत्य बदलण्याचा किंवा विकृत करण्याचा प्रयत्न करू नये, असे त्यांनी ठामपणे सांगितले. महाराष्ट्रात प्रत्येक विषयाला जातीय स्वरूप दिले जाते, मात्र हा विषय ऐतिहासिक आहे आणि तो तसाच पाहिला जावा, असेही भूषणसिंह होळकर यांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in