
मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील खेडचे मनसेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह मंगळवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी खेडेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत केले. अनेक वेळा खेडेकर यांचा भाजप प्रवेश लांबणीवर पडला होता, त्याला मंगळवारी अखेर मुहूर्त मिळाला.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला प्रचंड यश मिळवून देऊ, असा विश्वास खेडेकर यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी रवींद्र चव्हाण म्हणाले की, “विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्रासाठी समर्पित मोदी सरकार आणि महायुती सरकार जोमाने काम करत आहे. दोन आश्वासक नेतृत्वावर विश्वास ठेवत सर्वसमावेशक विकासासाठी एक धडाडीचा कार्यकर्ता आणि मित्रत्व जपणारे वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश ही आनंदाची बाब आहे.” त्यांच्या प्रवेशामुळे भाजपला कोकणात बळ मिळेल.”
खेडेकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीवर विश्वास असल्याने परिसर विकासासाठी भाजपमध्ये रवेश करत आहे. भाजप संघटना वाढीसाठी झोकून देऊन काम करेन. जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या साथीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकेल, अशी ग्वाही देतो.”