‘परभणी बंद’ला हिंसक वळण; संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना, दगडफेक, जाळपोळ, तोडफोडीच्या घटना; पोलिसांचा लाठीमार

परभणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची मंगळवारी एका मनोरुग्णाने विटंबना केल्यानंतर परभणी पेटले असून बुधवारी पुकारण्यात आलेल्या ‘परभणी बंद’ला हिंसक वळण लागले.
‘परभणी बंद’ला हिंसक वळण; संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना, दगडफेक, जाळपोळ, तोडफोडीच्या घटना; पोलिसांचा लाठीमार
Published on

परभणी : परभणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची मंगळवारी एका मनोरुग्णाने विटंबना केल्यानंतर परभणी पेटले असून बुधवारी पुकारण्यात आलेल्या ‘परभणी बंद’ला हिंसक वळण लागले. शहरात दगडफेक, वाहनांची तोडफोड व जाळपोळीच्या घटना घडल्या. काही ठिकाणी पोलिसांनी जमावावर लाठीमार व अश्रुधुराचा मारा केला. शहरात संचारबंदी लागू करण्यात आली असून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. या घटनेप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केल्याने संतप्त झालेल्या जमावाने पोलिसांसमक्ष सदर मनोरुग्ण व्यक्तीला अमानुष मारहाण केली. त्याला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने त्याचा जीव वाचला. सोमवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास ही घटना घडली. सोपान दत्तराव पवार (४५) असे आरोपीचे नाव आहे. तो मनोरुग्ण असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याला अटक करून रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीवरील काच फुटल्यानंतर कपड्याने ही प्रतिकृती झाकून ठेवण्यात आली आहे.

या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी परभणीत बंद पुकारण्यात आला होता. यावेळी आंदोलकांकडून शहरातील काही दुकानांची तोडफोड करण्यात आली. तर काही ठिकाणी वाहनांची जाळपोळ करण्यात आली. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या. मात्र, जमावाकडून पोलिसांच्या दिशेने दगडफेक करण्यात आल्याने पोलिसांनी लाठीमार केला. तसेच दंगल नियंत्रक पथकाला पाचारण करण्यात आले असून आता परिस्थिती नियंत्रणात आली आहे.

आंदोलकांमध्ये महिलांचा देखील समावेश असून, अनेक महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. त्यांनीही पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. परभणी बंद असताना जी दुकाने सुरू होती, अशी दुकाने आंदोलकांनी पेटवण्याचा प्रयत्न केला. शहराच्या मध्यवर्ती भागात हा प्रकार घडला.

परभणी शहरात सात ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या. अनेक ठिकाणी बॅनरची तोडफोड करून रस्त्यावर पेटवून देण्यात आले. परभणीतील आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने पोलिसांकडून परभणीतील रस्त्यावर मार्च काढण्यात आला.

इंटरनेट सेवाही बंद

परभणीतील तणावग्रस्त परिस्थितीमुळे जिल्हा प्रशासनाने बुधवारी दुपारी १ वाजल्यापासून इंटरनेट सेवा बंद केली आहे. पुढील आदेश येईपर्यंत इंटरनेट सेवा बंद राहील, असे जिल्हा प्रशासनाने एका पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

परिस्थिती नियंत्रणात

परभणीतील तणावपूर्ण परिस्थितीमुळे नांदेड परिक्षेत्राचे ‘आयजी’ शहाजी उमप शहरात दाखल झाले. उमप यांनी सांगितले की, परभणीत मंगळवारी घडलेल्या घटनेनंतर आज बंद पुकारला होता. आंदोलकांनी निवेदन देण्यासाठी येताना काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे फोडले. तर काही ठिकाणी टायर जाळले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात महिला आणि पुरुषांनी तोडफोड केली. मात्र, आता परिस्थिती नियंत्रणात आहे.

एसटी महामंडळाने बसफेऱ्या थांबवल्या

परभणी शहरात जाळपोळीच्या घटना घडल्यानंतर एसटी बसच्या फेऱ्या थांबवण्यात आल्या आहेत. इतर जिल्ह्यातून जालनामार्गे परभणी आणि जिंतूरला जाणाऱ्या जवळपास १५ एसटी बस जालन्यातील मंठा येथील बसस्थानकावर थांबवण्यात आल्या. जालन्यातील परतुर आणि अंबड आगारातील परभणीकडे जाणाऱ्या ७ बसफेऱ्या देखील रद्द करण्यात आल्या. खबरदारीचा उपाय म्हणून एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला.

महायुतीचे सरकार आल्यापासून अशा घटना घडताहेत - राऊत

महाराष्ट्रात महायुतीचे सरकार सत्तेत आल्यापासून येथे अशा घटना सर्रास घडत आहेत. मात्र, लोकांनी शांतता राखली पाहिजे, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली.

संविधानाची तोडफोड अत्यंत परभणीतील प्रकार संतापजनक - सुप्रिया सुळे

संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केल्याचा प्रकार संतापजनक आहे. हे कृत्य करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. संविधानाचा अवमान करणाऱ्यांना त्यातील समतेची तत्वे अमान्य आहेत असेच म्हणावे लागेल. या घृणास्पद कृत्याचा निषेध करते, असे ‘ट्विट’ शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

कुणाचा हात आहे का? याची चौकशी व्हावी - रामदास आठवले

संविधानाचा अपमान करणारा आरोपी पकडला गेला असून आंबेडकरी अनुयायांनी शांतता राखावी, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले. तसेच या सर्व प्रकरणामागे कुणाचा हात आहे का? याची देखील चौकशी व्हावी, अशी मागणीही आठवले यांनी केली आहे.

...त्यामुळे परिस्थिती चिघळली - वडेट्टीवार

सदर घटना उघडकीस आल्यानंतर प्रशासन आणि पोलिस दलाने तात्काळ योग्य कारवाई करायला हवी होती. मात्र, ते न झाल्यामुळे आज परिस्थिती चिघळली असल्याचे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हटले आहे.

परभणीत संचारबंदी लागू

आंबेडकरी अनुयायांकडून परभणीमध्ये बुधवारी बंद पुकारण्यात आला होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू केले होते. परंतु, या आदेशाला न जुमानता शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारी मोठ्या प्रमाणात जमाव जमला. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तोडफोड

बंददरम्यान, काही मोर्चेकरी महिला थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिला आक्रमक झाल्याने पोलिसांनी त्यांना आत सोडले. कार्यालयात शिरल्यानंतर आंदोलक महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली. काही मोर्चेकरांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तोडफोड केली.

लज्जास्पद घटना - प्रकाश आंबेडकर

परभणीत मराठा जातीयवादी समाजकंटकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यापुढील भारतीय राज्यघटनेची केलेली तोडफोड अत्यंत लज्जास्पद गोष्ट आहे. बाबासाहेबांच्या पुतळ्याची किंवा दलित अस्मितेच्या प्रतिकाची अशी तोडफोड होण्याची ही पहिलीच घटना नाही. परभणीतील संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबनेतील आरोपींना २४ तासांत अटक करा, अन्यथा परिणामास तयार राहा, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

logo
marathi.freepressjournal.in