
वसई : शुक्रवारी सकाळच्या सुमारास वसईतील धसपाडा, नवापूर येथे महावितरण वटार विभागातील एक दुर्दैवी घटना घडली. ट्रान्सफॉर्मरवर काम सुरू असताना अचानक विजेचा प्रवाह सुरू झाल्याने चार कर्मचाऱ्यांना शॉक लागला. यामध्ये जयेश घरत या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर इतर तिघेजण गंभीर जखमी झाले.
वीजपुरवठा बंद न करता काम सुरू ठेवणे, ही महावितरणची मोठी दुरवस्था आणि निष्काळजीपणा असल्याचा आरोप होत आहे. या घटनेतील तपास पूर्ण झाल्यानंतर जयेश घरत यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, तसेच जखमी कर्मचाऱ्यांनाही योग्य मदत आणि भरपाई मिळावी, अशी मागणी आम आदमी पार्टी पालघर जिल्हाध्यक्ष व वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष जॉन परेरा यांनी केली.
नवापूर, वटार हद्दीत मृत्यू आणि जखमी झालेल्या वीज कर्मचाऱ्यांना न्याय देताना परिसरातील व्यावसायिक, रिसोर्ट, लाज अनधिकृत व्यावसायिक बांधकामधारक यांची विज जोडणी, वीज वापर याबाबत तपासणी करावी. तसेच चोरटी वीजबाबत त्वरीत विशेष मोहीम राबवून सबंधित अनधिकृत व चोरीची वीज वापर करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी. या वीज कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, मृत्यू झालेल्याच्या वारसांना आणि जखमी कर्मचाऱ्यांना तात्काळ महावितरणकडून आर्थिक मदत द्यावी.
- हरिश्चन्द्र पाटील, जिल्हा सहसचिव, शिवसेना (ठाकरे)