विहिंपच्या भूमिकेवरून वाद; राजकारण तापण्याची शक्यता

शारदीय नवरात्रोत्सवाला सोमवारपासून सुरुवात होणार आहे. एकीकडे या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असतानाच, आता नवरात्रोत्सवातील गरब्यामध्ये मुस्लिमांना प्रवेश देऊ नका, अशी भूमिका विश्व हिंदू परिषदेने घेतली आहे. नागपूरमधील गरबा आयोजकांना तशा सूचना दिल्याने राज्यातील राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : शारदीय नवरात्रोत्सवाला सोमवारपासून सुरुवात होणार आहे. एकीकडे या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असतानाच, आता नवरात्रोत्सवातील गरब्यामध्ये मुस्लिमांना प्रवेश देऊ नका, अशी भूमिका विश्व हिंदू परिषदेने घेतली आहे. नागपूरमधील गरबा आयोजकांना तशा सूचना दिल्याने राज्यातील राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.

विरोधकांनीही यावरून सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले आहे.

हा देशात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तर धर्माच्या नावावर राजकारण करून पोळी शेकायची आहे, असा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. "नवरात्रोत्सव फक्त हिंदूचा आहे. त्यामुळे गरब्यामध्ये मुस्लिमांना प्रवेश नको. गरब्यामध्ये प्रवेश देण्यापूर्वी आधारकार्ड तपासा. त्यानंतर प्रवेश द्या. मुस्लिम तरुणांनी गरब्यामध्ये प्रवेश केला, तर त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्या," अशा सूचना विश्व हिंदू परिषदेने केल्या आहेत.

प्रत्येक गरब्यावर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची करडी नजर असणार आहे. विश्व हिंदू परिषद या संदर्भात पोलिसांशी भेट घेऊन त्यांना पत्र देणार असल्याचे समजते. दरम्यान, मध्यप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातही यापूर्वी अनेकदा विश्व हिंदू परिषदेने अशी भूमिका घेतली आहे.

समाजामध्ये दरी निर्माण करण्याचे काम

"मुस्लिमांना गरब्यात प्रवेश नका देऊ, म्हणणाऱ्यांना आगच लावायची आहे. धर्माधर्मामध्ये आग लावून धर्माच्या नावावर राजकारण करायचे आहे आणि आपली पोळी भाजायची. त्यामुळे विश्व हिंदू परिषद काही नव्याने बोलत आहे, असे नाही. देशातील वातावरण दूषित करून सत्तेसाठी वाट्टेल त्या स्तरावर जायचे अशी भूमिका घेऊन भाजपच्या सर्व संघटना काम करतात," अशी टीका काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी केली.

logo
marathi.freepressjournal.in