विजय शिवतारे अन् सुनेत्रा पवारांची भेट चर्चेत; आतापर्यंत अजितदादांशी दुश्मनी पाहिली, आता दोस्ती पाहा - शिवतारे

बारामतीतून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर होणार असल्याच्या चर्चा असताना विजय शिवतारे आक्रमक झाले होते. त्यांनी अजित पवारांविरोधात भूमिका घेत बारामतीतून निवडणूक लढवण्याची घोषणाही केली होती.
विजय शिवतारे अन् सुनेत्रा पवारांची भेट चर्चेत; आतापर्यंत अजितदादांशी दुश्मनी पाहिली, आता दोस्ती पाहा - शिवतारे

विशेष प्रतिनिधी/मुंबई

राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर बारामतीत पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार आहे. महायुतीकडून सुनेत्रा पवार तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. याच निवडणुकीच्या अनुषंगाने आता दोन्हीही उमेदवारांनी आपला प्रचार करण्यास जोरदार सुरुवात केली आहे. याच दरम्यान अजितदादांवर टीका करणाऱ्या, तसेच त्यांना थेट आव्हान देणारे विजय शिवतारेंनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आहे. सुनेत्रा पवार पुरंदरच्या दौऱ्यावर आल्या असताना, दोघांमध्ये झालेली भेट आता चर्चेचा विषय ठरली आहे.

बारामतीतून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर होणार असल्याच्या चर्चा असताना विजय शिवतारे आक्रमक झाले होते. त्यांनी अजित पवारांविरोधात भूमिका घेत बारामतीतून निवडणूक लढवण्याची घोषणाही केली होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांची समजूत घातल्यानंतर त्यांनी आपली भूमिका बदलली आणि सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दर्शवला.

यानंतर आता सुनेत्रा पवार विजय शिवतारेंना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेल्याने या भेटीकडे सर्वांच्याच नजरा खिळल्या. सुनेत्रा पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी पक्षाचे अनेक कार्यकर्तेही विजय शिवतारेंची भेट घेण्यासाठी पोहोचले. यावेळी आतापर्यंत अजितदादांनी माझी दुश्मनी पाहिली, आता दोस्ती पाहा, असे विजय शिवतारे यांनी सुनेत्रा पवारांना सांगितले.

यावेळी सुनेत्रा पवार म्हणाल्या की, सासवड इथून जाताना बापूंच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी बापू म्हणाले, काही दिवसांपूर्वी माझी भूमिका जरूर वेगळी होती. मात्र राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो. आता दोस्तीचे नवे पर्व सुरू होताना पुरंदरमधील जनतेचे काय हित साधले गेले? हे स्वत: मुखमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सासवडमध्ये येऊन सांगणार आहेत. दि. ११ रोजी होणाऱ्या त्या मेळाव्यानंतर सर्व वातावरण स्वच्छ होईल. खऱ्या अर्थाने तो दिवस बारामती लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या विक्रमी विजयात महत्त्वाचा ठरणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in