चंद्रपूर : पाकने भारतावर चिनी बनावटीच्या ५ हजार ड्रोनद्वारे हल्ला केला. त्यांच्या एका ड्रोनची किंमत १५ हजारांच्या आसपास आहे. हे एक ड्रोन पाडण्यासाठी आपण १५ लाख रुपयांचे क्षेपणास्त्र डागले. आत्ता यामागे चीनचे डावपेच असल्याचा दावा केला जात आहे. मला वस्तुस्थिती माहिती नाही. पाकने आपली ४ राफेल विमाने पाडल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे सरकारने याप्रकरणी स्थिती स्पष्ट करण्याची गरज आहे, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
काँग्रेसने बुधवारी सद्भावना दिनानिमित्त चंद्रपूर येथे तिरंगा रॅली काढली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना विजय वडेट्टीवार यांनी काही सवाल उपस्थित केले. पुलवामा हल्ल्यात वापरण्यात आलेले २५० किलो आरडीएक्स कुठून आले याचा शोध लागला नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
लोकशाहीत जनतेला व विरोधकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. राहुल गांधी यांनी प्रश्न विचारताच सरकार ते सैन्याचा अपमान असल्याचा आरोप करते, अशी टीका त्यांनी केली.