

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत मतदारांनी १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत मतदार अर्ज भरून संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे जमा करावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने गुरुवारी केले.
भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार मतदान अर्ज भरून स्वाक्षरी केलेल्या मतदारांची नावे २४ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदारयादीत समाविष्ट केली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
कोणत्याही व्यक्तीचे नाव एकापेक्षा अधिक ठिकाणी मतदारयादीत नोंदवता येत नाही. त्यामुळे ज्या मतदारांची नावे एकाहून अधिक ठिकाणी असतील, त्यांनी सध्याच्या वास्तव्यास असलेल्या ठिकाणासाठीच गणनाअर्ज भरावा. इतर ठिकाणच्या अर्जावर ‘आधीच नोंदणीकृत’ अशी नोंद करावी.