पावसाचे प्रमाण कमी असलेल्या ६२ तालुक्यातील २७१ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. ४ ऑगस्ट २०२२ रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही घोषणा करण्यात आली. त्यानुसार संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून ५ ऑगस्ट २०२२ रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज दिली.
मदान यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या १७ मे २०२२ रोजीच्या आदेशानुसार, पावसामुळे निवडणूक कार्यक्रम बाधित होण्याची शक्यता कमी असलेले ६२ तालुके निवडून तेथील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार संबंधित तहसीलदार ५ जुलै २०२२ रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. त्यानंतर १२ ते १९ जुलै २०२२ या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येतील. १६ आणि १७ जुलै २०२२ रोजी शासकीय सुट्टी असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाहीत. तर २० जुलै २०२२ रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत २२ जुलै २०२२ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल. मतदान ४ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत होईल. मतमोजणी ५ ऑगस्ट २०२२ रोजी होईल.