मागील काही दिवस राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली. अनेक ठिकाणी नद्या नाल्यांना महापूर आले, तर काही ठिकाणी गाव वस्त्यांमध्ये पाणी शिरले. काही ठिकाणी दरड कोसळण्यासारख्या घटना घडून मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली. काही भागात मात्र अजूनही पावसाची प्रतिक्षा केली जात आहे.
सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. दरम्यान, हवामान खात्याकडून पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसंच कोकण किनारपट्टीसह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्हात ऑरेज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसंच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आमि सातारा जिल्ह्यालाही पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे.
याच बरोबर संपूर्ण विदर्भासह मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे.