अरविंद गुरव/ पेण : बहुचर्चित ग्रुप ग्रामपंचायत कृषी खारपाडा हद्दीतील हद्दीतील टंचाईग्रस्त वडमालवाडी आदिवासीसाठी अखेर शासनाच्या जलजीवन मिशन योजनेतून नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. या योजनेचे भूमिपूजन कुष्ठरोग निवारण समिती शांतीवनचे कार्याध्यक्ष तथा ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. प्रमोद ठाकूर, ग्रुप ग्रामपंचायत दुश्मि- खारपाडाच्या सरपंच नेत्रा घरत, सामाजिक कार्यकर्त्या मानसी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
मागील वर्षांनुवर्ष शुद्ध पाण्यापासून वंचित असलेल्या वडमालवाडी आदिवासी वाडीतील महिलांनी सांघटीत होवून संकल्प करीत ग्राम संवर्धन सामाजिक संस्था, प्रेरणा ट्रस्ट रीस आणि महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन या सामाजिक संस्थांच्या सहकार्याने पाठपुरावा करीत प्रसंगी मोर्चे आंदोलनासह आमरण उपोषणेही केली. याच संघर्षातून वडमालवाडीला अखेर रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने जलजीवन मिशन योजनेअंतर्गत ३६ लाख रुपयांची नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे येथील महिलांची पाण्यासाठी होणारी वनवन थांबणार आहे.
यावेळी ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रायगड भूषण सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, उपसरपंच संजय घरत ग्राम पंचायत सदस्य निशाकर घरत अनिता वाघे, हिरामण घरत, ॲड. हिरामण पारधी, योजनेचे ठेकेदार निखिल राठोड माजी सरपंच सविता वाघे, नर्मदा वाघे ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे राजू पाटील, सचिन गावंड, सतीश मोकल, सचिन पाटील, सचिन वाघे, सुनील वाघे, आरती वाघे, रेश्मा हिलम, सनी कोळी यांच्यासह इतर मान्यवर व वाडीतील आदिवासी बांधव उपस्थित होते.