"एकनाथ शिंदेंना अपमानित करायचं नव्हतं..." देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

ठाणे लोकसभेच्या जागेवरूनही महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यात जोरदार रस्सीखेच झाल्याचं पाहायला मिळालं. अखेर भाजपनं या जागेवरील आपला दावा सोडला आणि ही जागा शिवसेनेला मिळाली.
ठाणे लोकसभा मतदारसंघ
ठाणे लोकसभा मतदारसंघप्रातिनिधिक फोटो

मुंबई: सध्या देशभरात लोकसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरु आहे. महाराष्ट्रामध्येही महायुती आणि महाविकास आघाडी यांमध्ये काटे की टक्कर दिसून येत आहे. यंदा जागावाटपाचा तिढा सोडवताना महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची दमछाक झाल्याचं पाहायला मिळालं. ठाणे लोकसभेच्या जागेवरूनही महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यात जोरदार रस्सीखेच झाली होती. अखेर भाजपनं या जागेवरील दावा सोडला आणि ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला देण्यात आला. सध्या या जागेवरून शिवसेनेचे नरेश म्हस्के निवडणूकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान भाजपनं ठाणे लोकसभेवरील आपला दावा का सोडला, या प्रश्नाचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. 'मुंबई तक' या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

एकनाथ शिंदेंचा अवमान करायचा नव्हता....

फडणवीस म्हणाले की, "ठाणे लोकसभा मतदारसंघ आमचाच होता. रामभाऊ म्हाळगी, रामभाऊ कापसे, जग्गनाथराव पाटील यांच्या काळापासून ठाणे लोकसभा आमच्याकडे आहे. त्यामुळे आम्हाला हा मतदारसंघ हवाच होता. पण शिंदे गटाने जो तर्क समोर ठेवला तोही आम्हाला पटला. आनंद दिघे यांनी ठाणे मतदारसंघ बाळासाहेबांकडून मागून घेतला होता. आता दिघेंचेच सहकारी राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडून ही जागा जाणे, हे मुख्यमंत्री शिंदेंसाठी अडचणीचे ठरले असते. असा मुद्दा त्यांनी मांडला होता. त्यामुळे आपल्या मित्रपक्षाला अपमानित करून एखादी जागा मिळवावी, असा हेतू आमचा नव्हता. त्यामुळे आम्ही ती जागा शिवसेनेला सोडली"

उद्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान-

लोकसभा निवडणुकीचे तीन टप्प्यांतील मतदान पार पडलं असून चौथा टप्प्यासाठी उद्या (दि. १३ मे) मतदान होणार आहे. या टप्पात महाराष्ट्रातील नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छ.संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड या ११ मतदारसंघांत निवडणूका होणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in