
कोल्हापूर येथे 6 जून रोजी काही तरुणांनी स्टेटसला औरंगजेबाचे फोटो ठेवल्याने खळबळ उडाली. या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यानंतर पोलिसांनी जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश दिला. तसंच संघटनांच्या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ठिय्या आंदोलन करण्याचा सल्ला दिला. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या बाचाबाचीत आंदोलनाला हिंसक वळण लागलं. आंदोलकांना परवानगी नाकारल्यानंतर देखील त्यांनी मोर्चा काढल्यानं पोलिसांना लाठीचार्ज करत जमाव पांगवला. यावेळी संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगड फेक करण्यात आल्यानं पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधूराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.
या प्रकरणावर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करत आहेत. ठाकरे गटाने नेते खासदार संजय राऊत यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर टीका केली आहे. हा औरंग्याला गाडणारा महाराष्ट्र आहे. कोण डीपी ठेवतंय, कोण पोस्ट टाकतंय. ही कुणाची हिंतच नाहीये. असं राऊत म्हणाले आहेत. तसंच सरकार तुमचं आहे ना? मग असं करण्याची कोणाची हिंमत कशी होते? हे तुम्हीच पेरलेले लोक नाहीत नाही? औरंगजेबाच्या नावाने तणाव निर्माण करावा, वातावरण खराब करावं आणि निवडणुकांना सामोरं जाण्याचं तुमचं नियोजन आहे का? असा सवाल राऊत यांनी सत्ताधारी पक्षाला केला आहे.
यावेळी बोलताना राऊत यांनी हे काहीही करु शकतात. हे आपण देशभरात पाहिलंय. कर्नाटक, उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये हे झाल आता महाराष्ट्रात करतील. औरंगजेबाच्या नावानं आरोळ्या ठोकण्याची यांची हिंमतच नाही. यामागे कोणतं षडयंत्र आहे. हे कोण करतय हे पाहावं लागेल. तुमचं पोलीस खातं आहे. करा कारवाई. देशद्रोहाचे गुन्हा दाखल करुन त्यांना फासावर लटकवा. लोक संतप्त आहेत. असं म्हणत राऊत यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच आवाहन केलं आहे.