"अध्यादेशाविरोधात हायकोर्टात जाणार, कोणीही याला मराठ्यांचा विजय म्हणू नये"; मराठा आरक्षणावर सदावर्तेंची प्रतिक्रिया

जरांगे पाटलांचे ज्ञान काय? त्यांनी कोणत्या विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले आहे? त्यांनी कोणती डॉक्टरेट मिळवली आहे? असा सवालही सदावर्ते यांनी यावेळी केला.
"अध्यादेशाविरोधात हायकोर्टात जाणार, कोणीही याला मराठ्यांचा विजय म्हणू नये"; मराठा आरक्षणावर सदावर्तेंची प्रतिक्रिया

मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला आज मोठे यश आले आहे. राज्य सरकारने जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. राज्य सरकारने जारी केलेल्या अध्यादेशावर आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आक्षेप घेत उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. देशातील खुल्या वर्गातील जनतेवर अन्याय होणार नाही, याची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भात लवकरात लवकर आम्ही न्यायालयाची दारे ठोठावू, असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी हे आरक्षण टिकणारे नाही, असे म्हणत मराठा जनतेला कायद्याचे वाचन करण्याचा सल्लाही दिला.

याला कोणीही मराठ्यांचा विजय म्हणू नये-

सग्यासोयऱ्यांबाबत जे बोललं गेलं, ते आधीपासून कायद्यात अंतर्भूत आहेत. कुणीही या गोष्टीला विजयोत्सव वगौरे म्हणू नये, जरांगेंकडून ही दिशाभूल केली जाणारी बाब, आजच्या प्रकारच्या नोटिसेस दिल्या जाऊ शकतात, मात्र कायद्यानुसार आरक्षण टिकू शकत नाही. आज जर आपण ते नोटिफिकेशन पाहिलं तर ते नोटिफिकेशन एक नोटीस आहे. म्हणून सर्व बाबी पाहून लवकरात लवकर उच्च न्यायालयाचे दार ठोठावण्यात येईल, असे सदावर्ते म्हणाले. "माझ्यावर देशासह राज्यातील खुल्या प्रवर्गातील ब्राह्मण, वैश्य, जैन आणि मागासवर्गीयांमधील गुणवंताच्या अधिकारांना शाबुत ठेवणे, त्यांच्या अधिकारांवर गदा येऊ न देणे, त्यांची गुणवत्ता एका विशिष्ट स्तरावर आणणे, याची जबाबदारी आहे. मागासप्रवर्गातील माझे लोहार, वडार, सुतार, नाभिक भाऊ असेल यांच्या अधिकारांचं संरक्षण करण्याचं, त्यांच्या जागा टिकवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाची संरक्षणाची जबाबदारी जयश्री पाटील आणि माझी आहे", असेही सदावर्तेंनी सांगितले.

माझ्या मराठा बांधवांना EWS आरक्षणाच्या लाभापासून वंचित करण्यासाठी हे आंदोलन उभारले होते. आज जर आपण ते नोटिफिकेशन पाहिलं तर ते नोटिफिकेशन नोटीस आहे. म्हणून सर्व बाबी पाहून लवकरात लवकर उच्च न्यायालयाचे दार ठोठावण्यात येईल. हे आंदोलन ज्यांनी उभे करण्याचा प्रयत्न केला ते रोहित पवार, संजय राऊत यांनी स्वत:ची जागा तपासावी, असे म्हणत पॉलिटिकल स्टंट म्हणून रोहित पवार आणि संजय राऊत यांनी उभे केलेले हे कुभांड होते, अशी टीका त्यांनी केली.

जरांगे पाटलांचे ज्ञान काय?

गुणरत्न सदावर्ते यांनी यावेळी बोलताना मनोज जरांगे-पाटील यांच्यावर निशाणा साधला. जरांगे पाटलांचे ज्ञान काय? त्यांनी कोणत्या विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले आहे? त्यांनी कोणती डॉक्टरेट मिळवली आहे? असा सवाल सदावर्ते यांनी यावेळी केला.

logo
marathi.freepressjournal.in