गेल्या काही महिन्यांपासून आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असलेले राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना त्यांच्या पदावरून मुक्त केले जाण्याची शक्यता आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या निकटवर्तीयांकडे आपल्या पदावरून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्याचे संकेत मिळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कोश्यारी यांनी त्यांच्या राज्यात परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंग यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल विधान केले होते की, शिवाजी महाराज हे जुन्या काळातील नायक होते. त्यानंतर त्यांच्या वक्तव्याचे राज्यात तीव्र पडसाद उमटले. भाजप वगळता सर्वच पक्षांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. शिंदे गटानेही नाराजी व्यक्त केली. त्याशिवाय छत्रपती उदयनराजे भोसले, संभाजी छत्रपती यांनीही राज्यपालांविरोधात आक्रमक भूमिका घेतली.