प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र

महिला स्वयंपाकींच्या मानधनात वाढ; १ नोव्हेंबरपासून अंमलबजावणी

कुपोषण, मातामृत्यू, बालमृत्यू आदी समस्यांचे निर्मुलन करण्यासाठी डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेंतर्गत सकस आहार देण्यात येतो. या योजनेंतर्गत पोषण आहार आहार बनविणाऱ्या महिला स्वयंपाकींच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
Published on

मुंबई : कुपोषण, मातामृत्यू, बालमृत्यू आदी समस्यांचे निर्मुलन करण्यासाठी डॉ एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेंतर्गत सकस आहार देण्यात येतो. या योजनेंतर्गत पोषण आहार आहार बनविणाऱ्या महिला स्वयंपाकींच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता एक हजार रुपयांऐवजी २ हजार रुपये मानधन मिळणार असून याची १ नोव्हेंबरपासून अंमलबजावणी होणार आहे.

अनुसूचित क्षेत्रातील कुपोषण, मातामृत्यू, बालमृत्यू व कमी वजनाची बालके जन्माला येणे यांसारख्या गंभीर समस्यांचे निर्मूलन करण्यासाठी राज्यातील १६ आदिवासी जिल्ह्यात एकात्मिक बाल विकास प्रकल्पांतर्गत असलेल्या अंगणवाडयामार्फत अनुसूचित क्षेत्रातील गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना एक वेळचा चौरस आहार देण्यासाठी भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना १ डिसेंबर, २०१५ पासून सुरू करण्यात आली. तसेच अनूसूचित क्षेत्र व अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रातील अंगणवाड्यांतर्गत ७ महिने ते ६ वर्ष वयोगटातील सर्व बालकांना प्रति दिन शाकाहारी मुलांना २ केळी व मांसाहारी मुलांना १ उकडलेले अंडे आठवड्यातून ४ वेळा म्हणजेच महिन्यातून १६ दिवस एकवेळचा अतिरिक्त आहार देण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत लाभार्थी गरोदर व स्तनदा मातेसाठी एकवेळचा पोषण आहार तयार करणे व ७महिने ते ६ वर्षे वयोगटातील बालकांसाठी अंडी उकडणे इत्यादी अनुषंगिक कामासाठी दरदिवशी दोन तास कालावधी करता, प्रत्येक अंगणवाडी अंतर्गत एक महिला स्वयंपाकीची नेमणूक ग्रामसभेच्या सहमतीने आहार समितीकडून करण्यात येते व सदर महिला स्वयंपाकीसाठी अनुज्ञेय दरमहा १ हजार इतका मानधनाचा खर्च अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींना उपलब्ध करून दिलेल्या ५ टक्के अबंध निधी योजनेच्या निधीमधून अदा करण्यात येतो.

logo
marathi.freepressjournal.in