

नाशिक : सुरतहून शिर्डीकडे निघालेल्या साई भक्तांवर काळाने घाला घातला आहे. येवला तालुक्यातील एरंडगाव-रायते शिवारात चालकाचे नियंत्रण सुटल्याने फॉर्च्युनर गाडीचा भीषण अपघात झाला. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले आहेत. अपघाताची भीषणता एवढी होती की गाडीने तीन पलट्या घेतल्या. सर्व मृत सुरत येथील असल्याची माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी रात्री उशिरा हा अपघात झाला. सुरत येथून सात साईभक्त शिर्डीला येण्यासाठी फॉर्च्युनर गाडीत निघाले होते. प्रवासादरम्यान येवला तालुक्यातील एरंडगाव-रायते शिवारात चालकाचे नियंत्रण सुटले. गाडीने तब्बल तीन पलट्या खाल्ल्या. या अपघातात तीन साईभक्तांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. अपघाताची येवला तालुका पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.