मुंबईसह ठाणे, भिवंडीत १० टक्के पाणी कपात; धरणांत केवळ ४५.१२ टक्के पाणीसाठा

मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा तानसा विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ३९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो.
मुंबईसह ठाणे, भिवंडीत १० टक्के पाणी कपात; धरणांत केवळ ४५.१२ टक्के पाणीसाठा

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठ्यात घट होत असल्याने मुंबईवर पाणी कपातीचे संकट घोंघावू लागले आहे. मुंबईतील पाणी कपात टाळण्यासाठी राज्य सरकारकडे २ लाख ३० हजार ५०० दशलक्ष लिटर राखीव पाणीसाठ्याची मागणी करण्यात आली आहे. राज्य सरकारने फेब्रुवारी अखेरपर्यंत राखीव पाणीसाठा उपलब्ध न केल्यास मुंबईत १ मार्चपासून १० टक्के पाणी कपात लागू करण्यात येईल. तसेच मुंबईसह ठाणे, भिवंडीला मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतून पाणीपुरवठा होत असल्याने ठाणे, भिवंडीकरांनाही १० टक्के पाणी कपातीला सामोरे जावे लागले, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांत २४ फेब्रुवारी रोजी ४५.१२ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने मुंबईवर पाणी कपातीचे संकट आहे.

मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा तानसा विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ३९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणांत १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. परंतु यंदा सातही धरणांत ६ लाख ५३ हजार ६ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा जुलै अखेरपर्यंत मुंबईची तहान भागवू शकतो. जूनमध्ये पावसाने हजेरी न लावल्यास शहरात आणीबाणीची परिस्थिती ओढावू शकते. ती टाळण्यासाठीच आतापासून उपाययोजना करण्यात येत असून राज्य सरकारकडे अप्पर वैतरणा धरणातून ९३ हजार ५०० दशलक्ष लिटर, तर भातसा धरणातून १ लाख ३७ हजार दशलक्ष लिटर राखीव पाणीसाठ्याची मागणी केली. राज्य सरकारने राखीव पाणीसाठा दिल्यास ऑगस्टपर्यंत मुंबईची तहान भागू शकेल. त्यामुळे मुंबईवरील पाणी कपातीचे संकट दूर होईल, असा विश्वास पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.

दरम्यान, धरणातील पाण्याच्या पातळीत घट होत असल्याने १० टक्के पाणी कपातीचा प्रस्ताव पालिका प्रशासकाकडे सादर केला आहे.

ठाणे, भिवंडीलाही पाणी कपातीचा फटका!

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठ्यातून मुंबईची रोजची तहान भागवली जाते. ठाणे, भिवंडी महापालिका क्षेत्रात दररोज १५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. मुंबईत १ मार्चपासून १० टक्के पाणी कपात लागू केल्यानंतर ठाणे, भिवंडीतही १० टक्के पाणी कपात लागू करण्यात येईल, असेही पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. पाणी कपात लागू झाल्यास ऐन उन्हाळ्यात नागरिकांचे हाल होणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in