
मुंबई : गेल्या आठ महिन्यांत चोरीसह गहाळ झालेले सुमारे २४ लाख रुपयांचे १०७ मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले असून, एमआयडीसी पोलिसांच्या या कामगिरीचे वरिष्ठांकडून कौतुक करण्यात येत आहे. १ जानेवारी ते ३१ ऑगस्ट २०२३ कालावधीत अंधेरी परिसरातील विविध ठिकाणाहून अनेकांचे मोबाईल चोरीसह गहाळ झाले होते. याबाबत संबंधित तक्रारदरांनी एमआयडीसी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांच्या पथकाने आरोपींचा शोध सुरू केला होता.
गेल्या काही दिवसांत पोलीस उपनिरीक्षक कृष्णा खोत व त्यांच्या पथकाने मुंबईसह नवी मुंबई, गुजरात, बिहार, उत्तरप्रदेश, कोलकाता येथून चोरीसह गहाळ झालेले सुमारे २४ लाख रुपयांचे १०७ मोबाईल हस्तगत केले होते. एमआयडीसी पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमांत ते मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले आहे.