

मुंबई : सोशल मीडियावर सध्या एक व्हायरल व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत असून, त्यात २३ वर्षीय तरुणाने आपण मदत करण्याच्या उद्देशाने पुढे गेलो होतो, पण त्याची शिक्षा म्हणून तब्बल ४५ दिवस सेंट्रल जेलमध्ये राहावं लागल्याचा दावा केला आहे. या व्हिडिओमुळे भारतीय न्यायव्यवस्था आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
इन्स्टाग्रामवर कंटेंट क्रिएटर दीपक पारेखने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये संबंधित तरुण आपल्याबरोबर झालेल्या अन्यायाची घटना सांगताना दिसतो. तो सांगतो की, आजारी असल्याने तो घरीच होता आणि मोबाईलवर रिल्स पाहत बसला होता. त्याच वेळी घराबाहेर मोठा गोंधळ ऐकू आल्याने तो बाहेर गेला. परिसरात शेजाऱ्यांमध्ये जोरदार भांडण सुरू होते. इतर लोक फक्त पाहत उभे असताना, त्याने भांडण सोडवण्यासाठी हस्तक्षेप केला आणि जखमी व्यक्तीला स्वतः रुग्णालयात दाखल केले.
मात्र, दुसऱ्याच दिवशी पोलीस घरी आले आणि त्याला ताब्यात घेतले. आपण फक्त मदत केली होती, असे सांगूनही त्याच्यावर 'हाफ मर्डर'चा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा त्याचा दावा आहे. पोलिसांना माहित होते मी निर्दोष आहे, तरीही ४५ दिवस सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आले, असेही तो म्हणतो.
तुरुंगातील अनुभव आणि ‘गोरा झालो’ टिप्पणी
तुरुंगातील गंभीर परिस्थितीचे वर्णन करतानाच हलक्याफुलक्या शैलीत तो अनुभव सांगतो. तुरुंगातील अन्न अत्यंत खराब असल्याचे तो म्हणतो. नीट स्वच्छ न करता तळलेली मासळी किंवा अर्धवट शिजवलेल्या भाज्या मिळायच्या, असेही त्याचे म्हणणे आहे. तरीही, त्याने इतर कैद्यांशी मैत्री केली, वाद मिटवण्यात मध्यस्थी केली, इंग्रजी शिकवली आणि फुटबॉलचे सामने आयोजित केले, असे तो सांगतो. “सूर्यप्रकाश मिळत नव्हता, त्यामुळे मी सेंट्रल जेलमधून गोरा होऊन आलो,” असे त्याचे विधान सध्या सोशल मीडियावर विशेष चर्चेत आहे.
नेटकऱ्यांकडून कौतुक, व्यवस्थेवर टीका
दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये तो आपल्या प्रेमकथेबद्दल बोलताना दिसतो. गेली सात वर्षे सोबत असलेल्या आपल्या जोडीदाराने या कठीण काळात आपली साथ दिल्याचे तो सांगतो. या तरुणाच्या सकारात्मक दृष्टिकोनाचे आणि मदतीच्या भावनेचे नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे. अनेकांनी, निरपराध असूनही त्याला तुरुंगवास भोगावा लागल्याने न्यायव्यवस्थेवर तीव्र टीकाही केली आहे. हा व्हिडिओ शेअर झाल्यापासून आतापर्यंत (अवघ्या २४ तासांतच) ९० लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.