
प्राजक्ता पोळ / मुंबई
अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील तब्बल २५ लाख महिलांनी घेतला आहे. त्यात उत्पन्नाची मर्यादा ओलांडलेल्या काही महिलांनीही या योजनेचा लाभ उठवला आहे. त्यावर टीकेची झोड उठताच प्रशासनाने अर्जांची पुनर्तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर चार ते साडेचार हजार महिलांनी या योजनेतून माघार घेतली आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली.
शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना आदिती तटकरे यांनी या योजनेबाबत अनेक मुद्दे स्पष्ट केले. पात्रता निकषांची पूर्तता न करणाऱ्या महिलांना वगळण्यासाठी पडताळणी मोहीम सुरू करण्यापूर्वी राज्यभरातील चार हजारांहून अधिक महिलांनी या योजनेतून माघार घेण्याची विनंती करणारे अर्ज सादर केले आहेत. महिला व बालविकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक पातळीवरील सरकारी कार्यालयांमध्ये या योजनेचा लाभ बंद करण्याच्या विनंत्या येत आहेत.
'लाडकी बहीण' योजनेतील अर्जांची पुनर्पडताळणी सुरू आहे. त्यात पाच प्रमुख मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. या योजनेचा लाभ घेतलेल्या अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. लग्नानंतर इतर राज्यात गेलेल्या महिलांकडूनही अर्ज आले आहेत की, त्या लाभासाठी पात्र नाहीत. दुहेरी अर्ज आल्याच्या तक्रारीही प्राप्त झाल्या आहेत. यापैकी अनेक महिलांनी स्वेच्छेने लाभ परत करण्यास सुरुवात केली आहे.
मंत्री तटकरे पुढे म्हणाल्या की, लाभासाठी पात्र नाहीत हे लक्षात येताच काही महिलांनी राज्य सरकारचा निधी परत करण्यासाठी पुढाकार घेतला. तटकरे यांनी महिलांच्या प्रामाणिक दृष्टिकोनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.