
मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला आणि त्यावेळेपासून मुंबईकरांच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी कोरोनायोद्धा त्याविरोधात लढा देत आहेत. या लढ्यात पालिकेच्या प्रत्येक विभागातील अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस लढा देत असताना २७० योद्धांना जीव गमवावा लागला. कोरोना विरोधात लढा देत जीव गमावल्यानंतर मुंबई महापालिकेने आपली जबाबदारी पार पाडत १७७ योद्धांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाखांची आर्थिक मदत केली, तसेच शहीद कुटुंबीयांच्या १६० वारसांना पालिका नोकरीत समावून घेत आधार दिला आहे.
मार्च २०२०मध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर कोरोनाला हरवण्यासाठी डॉक्टर, परिचारिका, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, आया, सफाई कामगार आदींनी सहभाग घेतला. या लढ्यात पालिकेच्या प्रत्येक विभागातील अधिकारी व कर्मचारी उतरला. या लढ्यात उपायुक्त ते सफाई कामगार यांनी जीवाची बाजी लावत मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेतली; मात्र या लढ्यात उपायुक्त ते सफाई कामगार यांना कोरोनाविरोधातील लढ्यात अपयश आले आणि जीव गमवावा लागला. आतापर्यंत सात हजारांहून अधिक अधिकारी व कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाली, तर त्यापैकी २७० कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला.
कोरोना विरोधात लढा देत कर्मचारी व अधिकारी शहीद झाल्यानंतर कुटुंबीयांना वाऱ्यावर न सोडता १७७ शहीद कुटुंबीयांना आर्थिक आधार दिला आहे, तर २३ जणांना केंद्र सरकारच्या माध्यमातून ५० लाखांची मदत करण्यात आली. ज्या मृत कर्मचार्यांचे वारस लहान आहेत, १८ वर्षे पूर्ण झाली नाहीत, अशा सर्वांना वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर नोकरी देण्यात येईल, असे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.