
मुंबई : प्लास्टिक पिशव्यांवर कायमस्वरुपी बंदी घालण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशवी विक्री करणाऱ्यांवर तर कारवाई करण्यात येतेच. मात्र आता प्लास्टिक पिशवी घेऊन बाजारहाट करायला जाणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
मार्केटमध्ये भाजीपाला खरेदीसाठी जाताना प्लास्टिक पिशवी आढळल्यास संबंधित ग्राहकावर कारवाई करत ५०० रुपये दंड वसूल करण्यात येईल, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे. मुंबईतून प्लास्टिक पिशवी कायमस्वरुपी मुक्त करण्यासाठी नवीन वर्षापासून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पर्यावरण संवर्धनासाठी उपाययोजना
मुंबई महापालिकेच्या ९१ मंडई सध्या कार्यरत आहेत. या मंडयांचा विकास पालिकेने हाती घेतला आहे. यामध्ये माहीमचे सुप्रसिद्ध गोपी टँक मार्केट, दादरचे क्रांतिसिंह नाना पाटील मार्केट, नळ बाजार परिसरातील मिर्जा गालिब मार्केट, ग्रँट रोडचे लोकमान्य टिळक मार्केट आणि फोर्ट परिसरातील महात्मा फुले क्रॉफर्ड मार्केटचा कायापालट होत आहे. पालिकेच्या मार्केटचा विकास करताना या ठिकाणी पर्यावरण संवर्धनासाठी उपाययोजनाही करण्यात येणार आहेत. त्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचवणार्या प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घालून पर्यावरणपूरक वस्तूंच्या वापराची सक्ती करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.