
मीरा रोड: कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दोन दिवसांत १८ जणांचे बळी गेल्याने संपूर्ण देशात खळबळ माजली असतानाच शेजारच्या भाईंदरच्या भारतरत्न भीमसेन जोशी नागरी रुग्णालयात चार महिन्यांत ५७ जणांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक माहिती उघड झाली आहे. एप्रिल ते जुलैदरम्यान हे मृत्यू झाले आहेत.
मेमध्ये ११, जूनमध्ये १४, जुलैमध्ये २० जणांचा मृत्यू झाला आहे. हे जनरल रुग्णालय असून, ते २०० बेड्सचे आहे. गेल्या चार महिन्यांत ४५,५२९ रुग्णांनी इथल्या ओपीडीला भेट दिली. त्यातील ११२३ जणांनी डायलिसीस, ६२५० जणांनी एक्स-रे, तर ५१७० जणांनी ईसीजी काढले, २४६ महिलांची प्रसूती, २१६४ जणांची सोनोग्राफी, ३२९ जण आयसीयू, ८७७ लहान व मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत.
या रुग्णालयात पॅरा मेडिकल, सहाय्यक कर्मचाऱ्यांची मोठी गरज आहे. तसेच आयसीयूमध्ये डॉक्टर, स्त्री व प्रसूतीरोग तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ आदींची गरज आहे, असे वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले.
वैद्यकीय संस्था म्हणून काम करत असल्याने रुग्णालयाचा प्रशासकीय खर्च मोठा आहे. त्यामुळे हे रुग्णालय राज्य सरकारने ताब्यात घ्यावे, अशी विनंती मीरा-भाईंदर मनपाने केली होती. आता २०१८ मध्ये हे रुग्णालय राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले.