मुंबई : रविवार, १४ जानेवारीपासून 'एरंगळ जत्रा' सुरू होणार आहे. एरंगळ जत्रेत येणाऱ्या भक्तांसाठी बेस्ट उपक्रमाने ६४ जादा बसेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मालाड स्थानक (पश्चिम) ते एरंगळ आणि मार्वे बीच ते मढ, जेट्टी, मार्वे बीच ते एरंगळ दरम्यान बसमार्ग क्र. २७१ वर तसेच बोरीवली बसस्थानक (पश्चिम) ते मढ जेट्टी दरम्यान बसमार्ग क्र.ए- २६९ वर अशा एकूण सकाळी २२ आणि संध्याकाळी ४२ बसगाड्या सोडण्यात येणार आहेत.
या जादा बसगाड्या सकाळी ६ वाजल्यापासून सोडण्यात येणार आहे. तसेच प्रवाशांचा प्रतिसाद विचारात घेऊन, आवश्यकतेनुसार जादा बसगाड्या सोडण्याची व्यवस्था देखील करण्यात येणार आहे . प्रवाशांच्या मदतीसाठी मालाड स्थानक (पश्चिम), मार्वे बीच, मढ जेट्टी, एरंगळ, भाटी व्हिलेज, मालवणी आगार इ. ठिकाणी वाहतूक अधिकारी, बसनिरीक्षक यांची तसेच सुरक्षा अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. तरी प्रवाशांनी सदर बस फेऱ्यांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट उपक्रमातर्फे करण्यात आले आहे.