मुंबई महापालिकेला केंद्राकडून ९९० कोटींचे अनुदान

मुंबईत दररोज ६,३०० मेट्रिक टन कचरा जमा होतो आणि कांजूर व देवनार डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते
मुंबई महापालिकेला केंद्राकडून ९९० कोटींचे अनुदान

मुंबई : पिण्याच्या पाण्याचे संरक्षण, पुरवठा व व्यवस्थापन तसेच घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी मुंबई महापालिकेला केंद्र सरकारकडून ९९० कोटींचे अनुदान मिळाले आहे. यामुळे पाण्याचे संरक्षण करत मुंबईकरांना शुद्ध व स्वच्छ पाणीपुरवठा करणे अधिकाधिक शक्य होते, असे पालिकेच्या जल विभागाकडून सांगण्यात आले.

मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर असून मुंबई नेहमीच दहशतवादीच्या निशाण्यावर आहे. त्यामुळे मुंबईच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जाते. तसेच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे जाळे विस्तारले आहे. तसेच सुरक्षारक्षक व पोलिसांचा २४ तास खडा पहारा असतो.‌ मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रातील पाण्याच्या सुरक्षेसाठी आता केंद्र सरकारने धाव घेतली असून पाण्याचे संरक्षण व व्यवस्थापनासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे.‌

मुंबईत दररोज ६,३०० मेट्रिक टन कचरा जमा होतो आणि कांजूर व देवनार डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. दररोज जमा होणारा कचरा डम्पिंग ग्राऊंडवर पोहोचवण्यासाठी मुंबई महापालिकेची ३२२ तर कंत्राटी १,२६४ वाहने दिवसरात्र सेवा देत असतात. त्यामुळे दररोज जमा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करून विल्हेवाट लावली जाते. स्वच्छ व सुंदर मुंबईसाठी २०३० पर्यंत कचरामुक्त मुंबईचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे. मुंबई महापालिकेच्या कचरामुक्तीच्या संकल्पास केंद्र सरकारने हातभार लावला असून घनकचरा व्यवस्थापनासाठी आणि पाण्याच्या संरक्षण व व्यवस्थापनासाठी एकूण ९९० कोटी रुपयांचे अनुदान पालिकेला दिल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबईची लोकसंख्या दीड कोटींच्या घरात पोहोचली असून भविष्यात पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता, पाण्याचे संरक्षण करणे काळाची गरज आहे. १७५ किलोमीटर अंतरावरून मोडकसागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईची रोजची तहान भागवली जाते. मुंबईला दररोज ३,९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईकरांना शुद्ध व स्वच्छ पाणीपुरवठा व्हावा यासाठी पांजरापूर शुद्धीकरण प्रकल्पात रोज १३६५ दशलक्ष लिटर, भांडुप संकुल रोज - २८१० दशलक्ष लिटर आणि विहार तलावात रोज ९० दशलक्ष लिटर आणि तुळशी तलावात रोज १८ दशलक्ष लिटर पाणी आणले जाते.

११ हजार कामगारांमुळे मुंबईला शुद्ध पाणी

मुंबई शहरातील पाणीपुरवठा सुरळीतपणे चालू राहण्यासाठी दररोज सुमारे १,१५० अभियंते, ८, ९५० कामगार व इतर कर्मचारी वर्ग अव्याहतपणे कार्यरत असतो.

दररोज कचरा

जमा - ६,३०० मेट्रिक टन

कर्मचारी

कार्यरत - ३१,६७८

देवनार कांजूर डम्पिंग ग्राऊंडवर विल्हेवाट

कचरा वाहून नेण्यासाठी वाहने पालिका - ३२२

कंत्राटी वाहने - १,२६४

९४९ सामुदायिक

कचरा संकलन केंद्र

४७ सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण केंद्र

logo
marathi.freepressjournal.in