
मुंबई : मुंबईतील मालाड परिसरातील मढ कोळीवाडा किनाऱ्याजवळ मासेमारीची एक बोट मालवाहू जहाजाच्या धडकेनंतर रविवारी पहाटे बुडाली. बोट बाहेर काढण्यात यश आले असून या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
आठ अन्य बोटींच्या गटाने त्या भागातील बुडालेली बोट काढून किनाऱ्यावर आणली, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. बोटीच्या बचाव कार्यात नौदल आणि तटरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांनीही सहाय्य केले, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
मढ कोळीवाड्यातील हेमदीप हरीशचंद्र टिपरी यांची ही बोट होती. ती मालवाहू जहाजाने धडक दिल्याने बुडाली. स्थानिक बचाव गटाने ती पाण्याबाहेर काढून किनाऱ्यावर आणली. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नसून बोटीवरील खलाशाला वाचवण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.