
मुंबई : सुमारे एक कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी एका खासगी कंपनीचा संचालक आलोक सुखदेव प्रमाणिक याच्याविरुद्ध आंबोली पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. ३० दिवसांत गुंतवणूक रकमेवर आकर्षक व्याजदाराच्या आमीषाने आलोकसह इतर आरोपींनी आतापर्यंत अनेकांची फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. पळून गेलेल्या आलोक प्रमाणिकच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. दादर येथील स्वामी कृपा बिजनेस सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेडने गुंतवणुकीवर ३० दिवसांत चांगला परतावा मिळेल, असे आश्वासन दिले होते. त्याला भुलून विरारमधील तक्रारदार महिलेने गुंतवणूक केली होती. अशाप्रकारे या कंपनीत एकूण १ कोटी ६ लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. मात्र फेब्रुवारी २०२३ पासून कंपनीने परतावाची रक्कम देणे बंद केले. त्यामुळे अनेकांनी कार्यालयात धाव घेतली होती. मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदार महिलेने आंबोली पोलिसांत तक्रार केली होती.