
आईसारखे प्रेम, वात्सल्य वडील देऊ शकत नाहीत, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण सत्र न्यायालयाने नोंदवले आहे. आपल्या आठ व चार वर्षांच्या मुलांचा ताबा आपल्याकडे द्यावा, अशी मागणी वडिलांनी कोर्टाकडे केली होती. ती कोर्टाने फेटाळून लावली आहे.
न्यायालयाने सांगितले की, आई मुलांचा सांभाळ करण्यास सक्षम असेल तर अन्य व्यक्तीकडे ते देणे अयोग्य ठरेल. मुलांचे व्यक्तिमत्त्व घडवण्यात आईची भूमिका नि:संशय अत्यंत महत्त्वाची असते. मुलाला आईकडूनच चांगले संरक्षण, संस्कार मिळतात. आईच्या छायेतच मुले चांगल्या पद्धतीने वाढतात, असे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. यू. वडगावकर यांनी आपल्या आदेशात सांगितले.
मुलांच्या वाढीत आईचा वाटा अत्यंत महत्त्वाचा आहे. या प्रकरणात पत्नी ही गृहिणी असून, ती मुलांच्या शिकवण्या घेते, तर वडील हे उद्योजक असून ते आपल्या कामात व्यस्त असतात. ही वस्तुस्थिती पाहता मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी ही आईकडे राहणेच योग्य ठरेल, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. वडिलांनी आपल्या मुलांचा ताबा आईकडे देणे अपेक्षित आहे, हे त्यांनी न केल्यास पोलीस आयुक्त किंवा पोलीस अधीक्षकांची मदत घेणे आवश्यक ठरेल, असे न्यायालयाने सांगितले.