मुंबई महानगर क्षेत्रातील रस्ते खड्डे व वाहतूककोंडी मुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात यावेत. रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी एमएमआरडीए आणि एमएसआरडीसी यांनी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी येथे दिले. ही यंत्रणा खड्डे बुजवण्याचे काम अहोरात्र करणार आहे.
ठाणे जिल्हा आणि परिसरातील वाहतूककोंडी आणि रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात सह्याद्री राज्य अतिथिगृह येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. रस्त्यांवरील खड्डे आणि वाहतूककोंडीच्या उपाययोजनांबाबत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘एमएमआरडीए आणि एमएसआरडीसी या दोन्ही यंत्रणांनी स्वतंत्र अशा अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली टीम कार्यान्वित कराव्यात. या टीम २४ तास खड्डे बुजवण्याचे काम करतील. दर्जेदार अशी सामग्र वापरून रेडिमिक्स पद्धतीने खड्डे भरण्यात यावेत. नियुक्त अधिकाऱ्यांची ही टीम रस्ते कोणत्या यंत्रणेचे, हे न पाहता खड्डे भरेल. त्यासाठीचा खर्च संबंधित यंत्रणेकडून घेण्यात यावा. वेळेत आणि चांगल्या पद्धतीने रस्त्यांवरील खड्डे बुजवले जातील, याची काळजी घ्या. वाहतुकीची कोंडी आणि खड्डे यातून लोकांना दिलासा देण्यासाठी काम करा. रस्ता कोणाचा आहे, हे लोकांना माहीत नसते. त्यामुळे रस्त्यांची दुरवस्था होऊ नये, यासाठी प्रयत्न करा. खड्ड्यांबाबत वाहतूक पोलिसांना चांगली माहिती असते. त्यासाठी पोलिसांची मदत घ्या.
पोलिसांनीही या यंत्रणांच्या संपर्कात राहून रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सहकार्य करावे. महामार्गांवरील वाहतुकीचे नियमन करा. विशेषतः जेएनपीटी आणि अहमदाबादकडून येणाऱ्या वाहतुकीचे नियंत्रण करा. एमएमआरडीए क्षेत्रातील महापालिकांनी त्यांचे अंतर्गत रस्तेही खड्डेमुक्त राहतील, याची काळजी घ्यावी,” असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.