
रायगड जिल्ह्यातील खोपोली तालुक्यातील इर्शाळवाडीवर दरड कोसळल्याने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या ठिकाणी बचावकार्यासाठी मुंबई महापालिकेची टीम तीन बॉब कॅट संयंत्र, पोकलेन संयंत्र घेऊन घटनास्थळी दाखल झाली आहे. दरड कोसळल्यानंतर सतत बरसणाऱ्या पावसामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी मदत व बचावकार्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सूचना केली. तसेच मातीचा ढिगारा उपसण्यासाठी यंत्रसामग्री घेऊन जाण्याची सूचना केली. महानगरपालिका आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुधाकर शिंदे यांच्या निर्देशानुसार यंत्रसामग्री घेऊन मुंबई महापालिकेची टीम घटनास्थळी दाखल झाली. एकूण तीन बॉब कॅट संयंत्र घनकचरा व्यवस्थापन विभागाद्वारे रवाना झाले आहेत. माहीम रेतीबंदर, मुलुंड आणि जुहू येथून प्रत्येकी एक याप्रमाणे ही तीन वाहने रवाना झाली आहेत. पर्जन्य जलवाहिन्या विभागामार्फत वांद्रे येथून पोकलेन संयंत्र रवाना करण्यात आले आहे.